"धम्मचक्र प्रवर्तन, धर्मांतर आणि अशोक विजयादशमी" याचे महत्त्व...आणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...!!!





1] "धम्मचक्र प्रवर्तन, धर्मांतर आणि अशोक विजयादशमी"

मित्रांनो, आपण प्रगतिशील विचारांचे वारसदार आहोत, त्याचे वाहक आहोत आणि म्हणून काही अनावधानाने झालेल्या चुकीच्या गोष्टींचे आपण पुनर्विचार केला पाहिजे... कृपया हा लेख नीट वाचा चिंतन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मात्र जरूर कळवा... 

भ. बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर, सारनाथ येथे सर्वात प्रथम त्यांनी पांच भिक्खूंना धम्माची व्याख्या सांगितली. धम्माची तत्वे सांगताना त्यात चार अरिय सत्य, अरिय अष्टांगिक मार्ग, प्रतित्यसमुत्पाद, कार्यकारणभाव, अनित्यता आणि अनात्मा ही तत्वे सांगितले. एका धम्माची तत्वे सर्वात पहिल्यांदा सांगितली गेल्यामुळे, म्हणजेच धम्माचे चक्र पहिल्यांदाच फिरवल्यामुळे या दिवसाला "धम्मचक्रप्रवर्तन दिन" असे म्हणतात. 

तो दिवस आषाढ पौर्णिमेचा असल्याने आणि भ.बुद्धांसारख्या गुरूने आपल्या शिष्यांना प्रथमच संपूर्ण ज्ञान दिल्याने या पौर्णिमेला "गुरु पौर्णिमा" असे म्हणायला सुरुवात झाली. बौद्ध राष्ट्रांमध्ये देखील हीच आषाढ पौर्णिमा धम्मचक्रप्रवर्तन दिन म्हणून साजरी करण्यात येते. बुद्धोत्तर काळात देखील ही पौर्णिमा बौद्ध संस्कृतीचा अविभाज्य अंग बनली. म्हणजेच बुद्धांसारखा महापुरुष जेव्हा पहिल्यांदाच धम्माचे विचार मांडतात तेव्हा ते “धम्मचक्रप्रवर्तन” असते! या पांच भिक्खुंच्या नंतर अनेकजण बुद्धांच्या धम्माकडे आकर्षित झाले तेव्हा त्यांना बुद्धांनी “धम्मदीक्षा” दिली. या नवदीक्षित भिक्खूंना जेव्हा बुद्धांनी देशना दिली तेव्हा ते "धम्मचक्रप्रवर्तन" नव्हते, तर ती "धम्मदेशना' होती! 

 भ. बुद्धांच्या पंचेचाळीस वर्षांच्या धम्मप्रचार व प्रसार काळात, त्यांनी हजारों लोकांना धम्माची दीक्षा दिली आणि भिक्खू-भिक्खुणी संघ वाढत गेला. आज देखील ही परंपरा सुरु आहे आणि जगभरात लोकं बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत. याचाच अर्थ भ.बुद्धांनी धम्माबद्दल पहिल्यांदा सांगितले तेव्हा ते "धम्मचक्रप्रवर्तन" होते. बौद्ध धम्माचा स्वीकार करणाऱ्यांनी "धम्मदीक्षा घेतली" असे म्हटले जाऊ लागले.     
इ.स.पूर्व तिसरे शतक हा सम्राट अशोक यांचा उदयकाळ! एका साम्राज्याचा वारसा लाभलेल्या अतिमहत्त्वाकांक्षी राजा अशोक यांनी अनेक राज्ये काबीज केली आणि आपले अफाट साम्राज्य स्थापित केले. बुद्धांच्या विचाराने प्रेरित होऊन हा सम्राट बौद्ध धम्माचा स्वीकार करतो.

सतत दहा दिवस चाललेल्या या विजयोत्सवाला "अशोक विजयादशमी" म्हणून प्राचीन भारतात ओळखले जात होते. बौद्ध धम्माने आपल्या मानवतावादी विचाराने एक तलवारीवर मिळवलेला हा विजय होता! सम्राट अशोकाच्या काळात आणि त्यानंतरही बृहद्रथ या शेवटच्या मौर्य राजा पर्यंत हा दिवस “अशोक विजयादशमी” म्हणून साजरा केला जात असे. 

बुद्धविचाराचा सर्व दिशांना प्रसार व्हावा म्हणून सम्राट अशोकांनी धम्मप्रचारकांना वेगवेगळ्या दिशेला पाठवले. चारही दिशांकडे, पाठीला पाठ लावून बसलेले सिंह हे स्तंभशीर्ष शिल्प सम्राट अशोकांच्या धम्मप्रसाराचा लोगो होता. ते त्यांचे राजचिन्ह होते ते याच कारणासाठी! नंतरच्या काळात बृहद्रथ मौर्य याची हत्या त्याचा सेनापती, पुष्यमित्र शुंग याने कपटाने केली आणि बौद्ध धम्माच्या विचाराने चालणारे राज्य संपुष्टात येऊन वैदिक परंपरेचा कट्टर समर्थक असलेल्या शुंगाचे राज्य आले.

पुष्यमित्र शुंगाने बौद्ध धम्माचे विचार नष्ट करण्यासाठी, त्याचे प्रचारक असणारे बौद्ध भिक्खू यांना मारून टाकण्यासाठी प्रत्येक भिक्खूच्या हत्येसाठी शंभर सोन्याचे कार्षापण (नाणे) बक्षीस जाहीर केले. राज्यात असलेल्या हजारों भिक्खूंची कत्तल ही सोन्याच्या कार्षापणाची जणू काही लूट होती! मात्र तरीही बौद्ध धम्म संपूर्णपणे नष्ट होऊ शकला नाही.

इ.स.पूर्व सहाव्या शतक ते इ.स. दहावा शतकापर्यंत त्याचा प्रसार भारताच्या इतर राज्यात आणि विदेशात होत राहिला. अकराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून बौद्ध धम्माचा ऱ्हास होऊ लागला. वैदिक परंपरेतून सुरु झालेल्या हिंदू धर्माने बुद्धविचार संपविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याचाच भाग म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये महत्त्वाचे असलेले दिवस, सण, सोहाळे यांचे नामकरण सुरु होऊन त्यांना नवीन अर्थ देण्यात आला.

सम्राट अशोकांनी सुरु केलेला "अशोक विजयादशमी" याचे नामकरण विजयादशमी किंवा दशहरा किंवा दसरा असे झाले. याच सणाला दहा तोंड असलेल्या रावणाला मारण्याची प्रथा सुरु झाली. मुळात हे प्रतीक आहे. सम्राट अशोक यांच्यासह बृहद्रथ पर्यंत दहा मौर्य राजे होऊन गेले आणि ते सर्व बौद्ध धम्माचे पालन करणारे होते. त्यांचा नाश केल्याने बौद्ध धम्माचा ऱ्हास झाला म्हणून हे प्रतीक वापरण्यात आले. किंवा त्याचा दुसरा अर्थ असाही होतो कि बुद्धविचार (दशबल युक्त) नष्ट करून आनंदोत्सव साजरा करणे याचेही ते प्रतीक असू शकते. 

१९५६ साली जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा त्या आधी लोकांना जाहीर आवाहन करताना, प्रबुद्ध भारताच्या दि. २३ सप्टेंबर १९५६च्या अंकात बाबासाहेब लिहितात, "बौद्धधर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे. येत्या दसऱ्यास ता. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे. 

या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता माझा धर्म-दीक्षा विधी समारंभ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जाहीर व्याख्यान होईल". यावेळेस जे आवाहन पत्रक काढण्यात आले त्यात भारतीय बौद्धजन समिती, नागपूर शाखेचे चिटणीस, वामन गोडबोले "सामुदायिक धर्मांतर" या मथळ्याखाली लिहितात, "भारतीय बौद्धजन समितीचे संस्थापक व अध्यक्ष परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्धधर्मग्रहणविधी ब्रह्मदेशीय पूज्य भिक्षु चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते नागपूर येथे रविवार ता.१४ ऑक्टोबर १९५६ विजया दशमीचे दिवशी सकाळी ८ वाजता साजरा होईल". याचा अर्थ बाबासाहेब स्वतः या घटनेला "धर्मांतर" असे म्हणतात किंवा गोडबोले या घटनेला "बौद्धधर्मग्रहणविधी" असे म्हणतात. येथे हे लक्षात घेतले पाहिचे कि दोघेही जण या घटनेला "धम्मचक्रप्रवर्तन" म्हणत नाही कारण तो या ऐतिहासिक घटनेसाठी योग्य शब्द नव्हे! 

मग धम्मचक्रप्रवर्तन हा शब्द १९५६ साली आला कोठून? प्रबुद्ध भारतच्या २९ सप्टेंबर १९५६ च्या अंकात पहिल्याच पानावर छापले होते, "धर्मचक्राच्या नवप्रवर्तनासाठी चलो नागपूर! डॉ.बाबासाहेब यांचा बौद्ध दीक्षा समारंभ, विजयादशमी, १४ ऑक्टोबर सुप्रभाती". परंतु याच प्रबुद्ध भारतच्या ४ ऑगस्ट १९५६ च्या अंकात एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ती म्हणजे, "भारतीय बौद्धजन समिती नागपूर शाखेच्या विद्यमाने आषाढी पौर्णिमेस ता.२२.७.५६ या दिवशी धम्मचक्कपवत्तन दिनानिमित्त प्राध्यापक किल्लेदार यांचे उत्कृष्ट प्रवचन झाले....संपादक" याचा अर्थ प्रबुद्ध भारताच्या संपादकांना धम्मचक्रप्रवर्तन दिन कधी असतो हे माहित होते!

बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर हा दिवस निवडला कारण १९५६ सालच्या ऑक्टोबर महिन्यातील याच तारखेला अशोक विजयादशमी म्हणजे दसरा होता. लोकांना पुन्हा या दिवसाच्या मूळ नावाकडे आणि उद्देशाकडे बाबासाहेबांना घेऊन जायचे होते. सम्राट अशोकांनी जसे संपूर्ण राज्यात आणि जगात बुद्धविचार पेरण्याचे काम केले होते तसेच काम बाबासाहेबांना करायचे होते. 

त्यांनी सम्राट अशोकांची राजमुद्रा ही भारताची राजमुद्रा म्हणून निवडली, भारताच्या राष्ट्रध्वजावर अशोकचक्र विराजमान आहे, राष्ट्रपतींच्या शपथेसाठी केवळ बुद्धरुप साक्षीदार मानले गेले आहे आणि त्यांच्या आसनाच्या भिंतीमागे धम्मचक्रप्रवर्तनाय हे ब्रीदवाक्य लिहिले आहे. बाबासाहेबांच्या या मूळ उद्देशाकडे आणि त्यांच्या कृतीतून आम्हीं शिकले पाहिजे. 

म्हणूनच अशोक विजयादशमी, मग ती कोणतीही तारीख का असेना, हाच दिवस आम्हीं धर्मचक्रप्रवर्तन दिन न म्हणता, "धर्मांतर दिन" अथवा "धम्मदीक्षा दिन" अथवा "धम्म स्वीकार दिन" म्हणून साजरा केला पाहिजे. म्हणजेच आपल्या सर्व संवादात "अशोक विजयादशमी आणि धम्मदीक्षा (धर्मांतर) दिनाच्या शुभेच्छा" असे वाक्य आले पाहिजे! कारण हाच दिवस बाबासाहेबांना बौद्धधम्म गतिमान करण्यासाठी अभिप्रेत होता. हा दिवस सम्राट अशोकांच्या कार्याचा केवळ आदरच दर्शवित नाही, तर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे ते एक प्रतीक आहे आणि आपल्याला सतत आपल्या उद्दिष्टांची जाणीव करून देणारा दिवस आहे...

- अतुल मुरलीधर भोसेकर सर...✍️💗
९५४५२७७४१०
--------------------------------------------------------------------------


2 】 अशोक विजयादशमी की 14 ऑक्टोबर... !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मादीक्षेपूर्वी बौद्ध धम्माशी थेट संबधित असणारे दोनच महापुरुष 1. तथागत गौतम बुद्ध व 2. सम्राट अशोक. बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा प्रसार केला. कलिंगा युद्धाच्या नंतर हिंसावादी सम्राट अशोकाने अहिंसावादी, शांतीचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला व त्यानंतर सर्व प्रजेला सम्राट अशोकाने बुद्धाच्या दहा पारमिता वर आधारीत दहा कलमी कार्यक्रम दिला. म्हणूनच पुढे तो दिवस अहिंसेने हिंसेवर मिळवलेला विजय व दहा कलमी कार्यक्रम म्हणून 'अशोक विजया दशमी' म्हणून लोकं साजरा करू लागले.

सम्राट अशोका नंतरच्या काळात फार काळ बौद्ध धम्माला अनुकूल राजाश्रय मिळाला नाही व मनुवाद्यांनी कालांतराने कट, कारस्थाने रचून बौद्ध धम्म भारतातून संपवला. त्यातूनच पुढे शेकडो वर्षांच्या चालत आलेल्या सम्राट अशोकाच्या 'अशोक विजया दशमी' ला (Counter) प्रतिक्रांती म्हणून रामायणातील कथा पूढे केली व त्याचा प्रसार केला. ज्यामुळे कालांतराने सम्राट अशोकाच्या विजया दशमीचा इतिहास झाकला गेला.

बौद्ध आणि हिंदू हे दोन्ही धर्म वेगळे आहेत. त्यामुळे हिंदू धर्माच्या संबंधित रामायणाच्या कथेशी, मग भले ती खरी असो की काल्पनिक, त्याच्याशी बौद्धांनी स्वताचा संबंध जोडू नये. त्यामुळे मुळात 'अशोक विजया दशमी' रामायणाशी संबंधित नसून, ती सम्राट अशोकाने केलेल्या धम्मक्रांतीशी संबंधित आहे, हे सत्य बौद्धांनी समजून घ्यावे. बाबासाहेबानां बौद्ध धम्माची दीक्षा घेताना, इतिहासातील सम्राट अशोकाच्या धम्मक्रांतीच्या इतिहासाच्या संदर्भाला जोडूनच धम्मदीक्षा घ्यायची होती. त्यामुळेच त्यांनी अशोकाच्या विजयादशमीची निवड केली होती आणि म्हणूनच तर बाबासाहेबांनी धम्मदिक्षेच्या कार्यक्रम पत्रिकेवरसुद्धा 'रविवार दि.14.10.56 (अशोक विजयादशमी)' असा स्पष्टपणे उल्लेख केलेला होता.

1956 साली अशोक विजया दशमी योगायोगाने 14 ऑक्टोबर ला रविवारच्या दिवशी आली होती. आता प्रश्न असा येतो, की जर बाबासाहेबाना धम्मदीक्षेचा कार्यक्रम जर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी घ्यायचा होता असे जर मानले, तर मग त्यांनी 14 तारीखच का निवडली ? कारण त्याच महिण्यात 14 तारखेच्या अगोदर 7 ऑक्टोबर व नंतर 21 व 28 ऑक्टोबरला सुद्धा रविवारच होता. तरीसुद्धा बाबासाहेबांनी 7, 21 व 28 ऑक्टोबरची रविवारची तारीख निवडली नाही. त्यामूळे बाबासाहेबांनी सर्वांच्या सोयीचा रविवारचा दिवस निवडला हा दावाचं फोल ठरतो. (योगायोगाने 1956 चे ऑक्टोबर महिण्याचे कॅलेण्डर व 2018 चे ऑक्टोबर महिण्याचे कॅलेण्डर एकसमानच आहे, निरीक्षण केले तर 14 तारीखेचा गोंधळ दूर होईल). तसेच 1956 च्या पूर्वी 14 ऑक्टोबर या तारखेला कोणताही विशेष असा पूर्वइतिहास कधीच नव्हता. यावरून स्पष्ट होत की, केवळ विजयादशमी 1956 साली योगायोगाने 14 ऑक्टोबर या दिवशी आली होती, व बाबासाहेबांना विजयादशमीच्या दिवशीच धर्मांतर करायचे होते, त्यामुळेच बाबासाहेबांना त्या दिवशी धर्मांतर केले होते...


दुसरा मुद्दा अनेक जण असं बोलत आहेत की, बौद्ध धम्म आधुनिक, विज्ञानवादी आहे. त्यामुळेच बौद्धांनी धमचक्र प्रवर्तन दिन तिथीनुसार सण साजरा न करता तारखेनुसार करावा. जेणेकरून 14 ऑक्टोबरचा धमचक्र दिन पूर्ण जगात एकाच दिवशी साजरा होईल. मुळात ते लोक हे विसरत आहेत की येशू ख्रिस्तपूर्वीच्या सर्व घटना या पौर्णिमा, अमावस्येवर आधारित तिथी व कालगणनेनुसार केल्या जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने बौद्ध कालगणना व हिंदु कालगणना यांचा सामावेश होतो. त्यापैकी बौद्ध कालगणना ज्याला 'बुद्धाब्द' असेही म्हणतात. बौद्ध कालगणनेची सुरुवात ही "पौर्णिमे" पासून होते. विजयादशमी ख्रिस्तजन्मापूर्वीची आहे. त्यामुळे ती पौर्णिमा, अमावस्येवर आधारीत तिथीनुसारच केली जाते. तिथी केवळ हिंदू धर्माशीच संबंधित नाही आहे, कारण तिथींची गणना पौर्णिमा, अमावस्येवर आधारीत केली जाते. 

जेव्हा तारखा अस्तित्वात नव्हत्या तेव्हा सर्व व्यवहार पौर्णिमा, अमावस्येवर आधारीत तिथीनुसारच केले जात होते व त्यामुळेच तिथी जगमान्य आहेत. त्यामुळेच तर बुद्ध जयंती सर्व जगात एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते.
विजयादशमी तिथीनुसार येते म्हणून विरोध करणारे व तारखेचा आग्रह धरणारे लोकं, बुद्ध जयंती आपण वैशाख पौर्णिमेला साजरी करतो हे का विसरतात आणि केवळ आपल्याच देशात नाही. तर पूर्ण जगात बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमेला केली जाते. तसेच बौद्ध धम्मात पौर्णिमेला महत्व आहे. त्यांना सर्व बौद्ध राष्ट्रांत मान्यता आहे. मुस्लिमांची ईद सुद्धा चंद्राच्या भ्रमतीवर कालगणानेनुसार साजरी केली जाते.

तसेच अशोक विजया दशमीच्या दिवशी नागपूर मध्ये लाखो लोक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला दीक्षाभूमीवर जातात, त्याच दिवशी आरआरएस सुद्धा त्यांच्या स्वयंसेवाकांच मेळावा घेते. आरआरएसच्या स्वयंसेवाकांपेक्षा बौद्धांची संख्या 100 पटीने अधिक असते. ज्यामुळे आरआरएसच्या कार्यक्रम झाकला जातो व त्यांना अपेक्षित मीडिया कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे आरआरएसनेचं त्यांच्या काही हस्तकांमार्फत शिवजयंती प्रमाणेच धम्मचक्र प्रवर्तन दिना बाबतही तिथी की तारिख हा निरर्थक वाद उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जेणेकरून धम्मचक्र प्रवर्तन दिन पूर्ण भारतात विशेषतः नागपूर मध्ये एकाच दिवशी साजरा होऊ नये. त्याला काही सुशिक्षित बौद्ध आजाणतेने बळी पडत आहेत. त्यामुळेच आरआरएसच्या या छुप्या षडयंत्राला बळी न पडता व 'तिथी की तारिख' या निरर्थक वादात न पडता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर केलेल्या दिवशीच धमचक्र प्रवर्तन दिन साजरा करावा... 

जय भिम....

- प्रवीण जाधव....✍️

--------------------------------------------------------------------------

3】धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करायचा, १४ आॅक्टोंबर नाही. भिक्कु संघाद्वारे एका संस्थापक बांधनीतुन बुद्ध विचाराचा प्रचार व प्रचार सुरु झाला होता. बुद्धाची सैद्धांतिक मांडणी तयार झाल्यावर ज्याला लोकभाषेत ज्ञानप्राप्ती म्हटलं गेलं तेव्हा उरूवेला नदीकाठी ६ आठवडे बुद्ध या विचारात होता की जे मला कळालं ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावं की नको ? पोहचावं तर कोणत्या मार्गाने ? अडीच हजार वर्षांपूर्वी आत्मा, स्वर्ग, पुनर्जन्म, ईश्वर, याचं आस्तित्व नाकारुन वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व सामान्य लोकांना स्वीकारायला भाग पाडणं हे सोपं नव्हतं. समता न्याय बंधुभाव याची शिकवण देणारी ती जगातली सर्वात मोठी institutional planning होती जे सर्व सामान्य लोकांपासून ते धनिक व्यापारी ते विविध राजे यांना प्रभावित करणारी ठरली. राजकारणात लोककल्याणकारी सुत्र गोवण्याचे काम धम्मदेशनेतुन घडुन आणलं. पंच वर्गीय भिक्कु बुद्धाच्या शिकवणीतुन ज्ञान प्रसाराला सक्रीय झाले तो दिवसच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिवस म्हणून ओळखला जातो. याआधी हा दिवस नव्हता, ना ब्राम्हण कधी साजरा करत. म्हणुन धम्मचक्र प्रवर्तन दिन ही बौद्ध परंपरेतली celebration space आहे. याच दिवसाला, ऐतिहासिक संदर्भाला उजाळा देण्यासाठी बुद्धांच्या सुमारे अडीचशे वर्षांनंतर सम्राट अशोकाने धम्म चक्र दुसऱ्यांदा गतीमान केले. धम्म प्रसाराचे काम निश्चितच बुद्धापासुन ते अशोकापर्यत सतत रात्रंदिवस चालुच होतं पण अशोकाच्या संदर्भाने दुसऱ्यांदा चक्र प्रवर्तन किंवा गतीमान झालं यासाठी म्हटलं की इतिहासात ते तेव्हापर्यतचं सर्वात मोठं mass mobilization ठरलं. देश विदेशात बुद्ध विचार पोहचवण्याचं कार्य स्वता चक्रवर्ती सम्राटाने मिशन म्हणून पुर्ण केलं. बाबासाहेबांनी बौद्ध साहित्य व परंपरेचा जो अभ्यास केला तेव्हा या दिवसाचं त्यांना महत्व व ऐतिहासिक संदर्भ माहीत नसेल काय ? म्हणुन आधुनिक भारतात अडीच हजार वर्षांनंतर लाखो लोकांना सोबत घेऊन सर्वात मोठं ऐतिहासिक mass conversation घडुन आणलं. तेव्हा त्यांनी जो दिवस निवडला तेव्हा तो काही निव्वळ योगायोग नव्हता तर ऐतिहासिक संदर्भाशी अस्पृश्य समुहाला जोडण्याचा प्रयत्नाचे कटिबद्ध नियोजन होते. रामायन, महाभारताच्या भाकड कथा या सम्राट अशोक नंतर पाचव्या वंशातल्या बृहद्रथ मौर्यचा खुन पुष्पमित्र शुंगा या ब्राम्हण लष्करी अधिकाऱ्याने केल्या नंतर प्रसुत केल्या. नथुराम गोडसे बद्दल जसं आज कथा, नाटक, पुस्तक, कांदबऱ्या, चित्रपट यांचा भडिमार करुन खुनाची मुळपार्श्वभुमी व मानसिकता  लपवली जाते तसंच तेव्हा घडलं. आणि हीच ब्राह्मणांची मोडंस ओपरेंडी आहे. कथा रचण्यात व तिचा प्रसार करुन सत्य भासवण्यात माहीर आहेत. ऐतिहासिक कोणत्याही पटलावर तुम्हाला हे दिसुन येईल. ही क्रांती प्रतिक्रांतीची डावपेच आहेत. बाबासाहेब जेव्हा म्हणतात, "The history of India is a history of mortal conflict between buddhism and Bramhinism". तेव्हा हे लक्षात येईल. आणि अस्पृश्य हे नव बौद्ध नाही. तर मुळचे पारंपरिक बौद्ध आहे. जेव्हा आपण ब्राम्हण धर्माला शरणागती नाकारली तेव्हा अवर्ण, अस्पृश्य ठरवलो गेलो होता. आपण संविधानाच्या माध्यमातून "आपला" मुळ धम्माचा उपासनेचा सार्वजनिक हक्क reclaim केला, परत मिळवला. याच ऐतिहासिक तथ्याला समोर आणण्यासाठी हा बाबासाहेबांनी अशोका विजयादशमी दिवस सामुहिक धर्मांतरासाठी निवडला. म्हणुन तारखेचा घोळात पडु नये. 
कारण नवा नॅरेटीव, नवा डिस्कोर्स धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या दिवशी सेट झाला जो की भारतीय कालगणनेनुसार आहे. तिथे इंग्रजी तारखाचा जे १६ व्या शतकां नंतर भारतात आले, त्यात अडकु नका. 
I repeat.... बाबासाहेब  म्हणतात, "The history of India is a history of mortal conflict between buddhism and Bramhinism".

-Rahul Pagare...✍️
------------------------------------------------------------------------------------------------------

4】 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...!! !

दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू
धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व
नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी
दिक्षा दिली.
दुसर्या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी
सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन
व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे
ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण
दिले. या घटनेला आज ५५ वर्षे लोटून गेलीत.
तेव्हा त्यांनी ज्या पोटतिडकीने
दिशानिर्देश दिलेत त्यानुसार समाजबांधव
वागला कां याचा विचार करणे आवश्यक आहे.
बाबासाहेब भाषणात म्हणाले होते की,
’आम्हाला इज्जत प्यारी आहे आहे, लाभ
प्य्रारा नाही.’
केसरीच्या बातमीदाराने संगमनेरच्या सभेत
चिठ्टी पाठवून बाबासाहेबांना विचारले
होते की, ’तुमचे लोकं हलाखीमध्ये जगत आहेत.
त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाहीत.
त्यांना अन्न नाही. शेतीवाडी नाही अशी
त्याची बिकट परिस्थिती असतांना मेलेली
ढोरे ओढू नका असे तुम्ही सांगत असल्यामुळे
त्यांचे दरवर्षी कातड्याचे, शिंगाचे, मांसाचे
५०० रुपये उत्पन्नाचे नुकसान होते.’ तेव्हा
बाबासाहेब म्हणाले होते की, ’तुम्ही, तुमचे
पांच मुले, तुमच्या भावाच्या ५/७ मुलांमिळून
तुमच्या कुटूंबानी हे काम करावे म्हणजे तुम्हाला
५०० रुपयाचे उत्पन्न मिळेल. त्याशिवाय मी
दरवर्षी तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची
व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल,
त्यांना अन्न-वस्त्र मिळेल की नाही ते माझे
मी पाहून घेईन. मग एवढी फायद्याची गोष्ट
तुम्ही कां सोडून देता? तुम्ही कां हे करीत
नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा
होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही?
ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे…’
दुसर्या एका ब्राम्हण मुलाने, पार्लमेंट,
असेंब्ल्याच्या जागा कां सोडता असे
विचारले होते. त्यावर बाबासाहेब म्हणाले
की, ’तुम्ही महार बनून भरा.’
म्हणून बाबासाहेब म्हणतात की, आम्ही
झगडतो आहोत ते इज्जतीकरीता! मनुष्य
मात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरितां आम्ही
तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो
त्याग करण्याची आमची तयारी आहे.
काय बाबासाहेंबाच्या या
म्हणण्यानुसार समाजबांधव वागत आला आहे
कां? की स्वार्थासाठी वाटेल ते, प्रसंगी
स्वाभिमान, मानसन्मान व इज्जत गहान
ठेवायला मागेपूढे पाहिले नाही. याचा जाब
अशा लोकांनी स्वत:ला विचारायला नको
कां?
बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते
की, ’आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५
पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली.
मी.हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू
धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी
मागेच केली होती आणि काल मी ती खरी
करुन दाखविली. मला इतका आनंद झाला की-
हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला
वाटते.’
काय आपण सुध्दा पुर्णपणे हिंदू धर्माच्या
संकृतीचा, रितीरिवाजाचा त्याग केला आहे
कां? असा प्रश्न आम्ही स्वत:ला विचारायला
नको कां?
पुढे बाबासाहेब म्हणतात की, ’मला
कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द
धर्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणीवेने आले
पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.’
काय बाबासाहेंबाच्या म्हणण्यानुसार,
समाजबांधवांनी बौध्द धम्म आतातरी पटवून
घेतला आहे कां? धम्माची शिकवन समजून घेऊन
इतरांना समजून सांगितली काय? याचा जाब
प्रत्येकांनी स्वत:ला विचारायला नको कां?
भगवान बुध्दाचा उपदेश सांगतांना
बाबासाहेब म्हणतात की, बौध्द संघ हा
सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व
समान आहेत. सागरात गेल्यावर हे गंगेचं पाणी
किंवा हे महानदीचे पाणी ओळखणे अश्यक्य
असते. त्याप्रमाणे बौध्द संघात आले म्हणजे
आपली जात जाते व सर्वजण समान असतात.
काय लग्न जुळवतांना आपण पोटजातीचा
विचार करतो काय? याचा जाब अशा
लोकांनी विचारायला नको काय?
बाबासाहेबांनी भाषणामध्ये धर्मास
ग्लानी कां येते? या राजा मिलिंदानी
विचारलेल्या प्रश्नाला भन्ते नागसेनाने
दिलेल्या उत्तराचे विवेचन करतांना तीन कारणे
सांगितली आहेत.
१. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा
असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वांत गांभीर्य
नसते. तो कालिक धर्म बनतो व कालानुसार
अशा धर्म टिकतो.
२. दुसरे कारण हे की, धर्म प्रचार करणारे
विद्वान लोक नसतील तर धर्मास ग्लानी येते.
ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले
पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास
धर्माचे प्रचारक सिध्द नसतील तरी धर्माला
ग्लानी येते.
३. आणि तिसरे कारण हे की, धर्म व धर्माची
तत्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व
सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते
तेथे जाऊन आपल्या श्रेष्ट विभूतिचे पूजन करतात.
बाबासाहेब म्हणतात की, आपण बौध्द धर्म
स्विकारतांना ही कारणे लक्षांत ठेवली
पाहिजे. बौध्द धर्माची तत्वे कालिक (काही
काला पुरती) आहेत असे कोणासही म्हणता
यावयाचे नाही.
काय धम्म प्रचारासाठी व गांवा-
गांवात, मोहल्या- मोहल्यात बुध्द विहारे
बांधण्यासाठी समाज बांधवांनी विशेषत:
शिकलेल्या बुध्दिजीवी वर्गांनी पुढाकार
घ्यायला नको काय? कारण हा वर्ग समजून घेउन
इतरांना समजावून सांगू शकतो. हा वर्ग
बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभधारक आहे.
तेव्हा या लोकांवर बाबासाहेबांची चळवळ
पुढे नेण्याची जबाबदारी येऊन पडत नाही
काय?
बाबासाहेब पुढे म्हणतात की, “मात्र तूमचीही
जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर
लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल
अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे
आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू
नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी
सध्या शुन्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रितीने
धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे.
नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक
स्थितीस आणला असे होऊ नये, म्हणून आपण दृढ
निश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर
आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर
जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच
जगाचा उध्दार होणार आहे.”
काय आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा
प्रयत्न केला काय किंवा करतो काय? आपल्या
कृतीने बुध्द धम्म निंदाजनक स्थितीस आणला
असे झाले तर नाही ना? याचा अंतर्मुख होवून
सर्वांनी विचार करायला नको काय?
बाबासाहेब पुढे म्हणतात की, “ हा नवा
मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प
केला आहे, काही इच्छिले आहे, हे तरूणांनी
लक्षांत घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू
नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा
हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा.
काय आपल्या उत्पनाचा विसावा
हिस्सा म्हणजे पांच टक्के आपण
बाबासाहेबांच्या कार्याकरीता योगदान
देतो काय? कां हेही पैसे आपण आपल्याच घरात,
शौकपाण्यासाठी खर्च करतो? याचा
विचार आपण करायला नको काय? हा पैसा
बाबासाहेबांचा आहे आणि तो मी
बाबासाहेबांच्याच कामाकरीता खर्च करेन
याची जाणीव किती लोकांना आहे?
भाषणाच्या शेवटी बाबासाहेब म्हणतात
की, “दरेकांनी दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक
बौध्द माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार
आहे असे मी जाहीर करतो.”
काय इतर जाती-धर्माच्या लोकांनी
बौध्द धम्म स्विकारावा म्हणून आपण अशी
काही यंत्रना निर्माण करु शकलो काय?
याचा आम्ही विचार करायला नको काय?
बाबासाहेबांचे भाषण व त्यावर आपली
जबाबदारी याचा विचार करुन जर सर्वांनी
एकत्र येऊन एका सुत्रबद्द पध्दतीने व
निष्ठापूर्वक रितिने वाटचाल करण्याचा
निर्धार केला तर खर्या अर्थाने
बाबासाहेबांचे ’भारत बौध्दमय’ करण्याचे
स्वप्न काही अंशी साकार झाल्याशिवाय
राहणार नाही, हे निर्वीवाद सत्य आहे.
------------------------------------------------------------

5 】 धर्मांतराबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार.... !!


"भारत देशाच्या हिताला धोका येईल अश्या प्रकारचे धर्मांतर मी करणार नाही, याबद्दल तुम्ही निश्चिंत असा, एवढेच काय पण, "देशहितासाठी" माझ्या समाजाच्या प्रगतिवर मला जळजळीत कोळसे ठेवण्याची वेळ आली तर मी तसे करण्यास का-कु करणार नाही."...!
-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर..✍📚
【Ref:25 आँक्टोबर 1935...!】
--------------------------------------------------------------
----------------------
धर्मांतर हा मौजेचा विषय नव्हे, हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे,
जहाज एका बंदरातुन दुसर्या बंदराला नेन्याकरीता नावाडयाला जेवढी पुर्वतयारी लागते तेवढीच पुर्वतयारी धर्मांतराकरिता करावी लागणार आहे..
-विश्वरत्न..डॉ बाबासाहेब आंबेडकर....✍📚
【Ref- जनता २० जून १९३६】
----------------------------------------------------------------
---------------
"धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी कृती करावयास आता तुम्ही शिकले पाहिजे आणि हे आपणास साधले तर आपल्याबरोबर देशाचा... इतकेच नव्हे जगाचाही उध्दार होणार आहे.......
-विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर.....✍📚
【Ref:धर्मांतर १५ ऑक्टोबर १९५६ 】
--------------------------------------------------------------------
----------------

खरे तर बुद्धधम्माच्या पुनरुत्थानाचे कार्य भारतात उशिरा सुरु केल्याबद्दल मला अपराध्यासारखे वाटत आहे...परंतु तरीही मला आशा आहे की, जी माझी माणसे आपल्या ऐशोआरामाला तिलांजली देतील आणि प्रामाणिकपणे माझे अनुसरण करतील ती माणसे भारतात बुद्धधम्म प्रसारित करण्यास मनःपुर्वक संघर्ष सुरु ठेवतील, मला तसा विश्वास आहे...
-विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर...✍️📚
【Ref:प्रबुद्ध भारत - १७ नोव्हे १९५६ मधुन】
--------------------------------------------------------------------------------
--------------------

"हिंदू धर्मातील या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तुम्हाला जितकी जरूरी आहे, तितकी हिंदूंना नाही. अशा रीतीने विचार केला असता, हा हिंदू धर्म तुम्हाला दोन्ही तऱ्हांनी मारक झाला आहे...या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलाम केले आहे व याच धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे...

-विश्वरत्न.डॉ बाबासाहेब आंबेडकर...✍️📚
【Ref:"मुक्ती कोन पथे" मुंबई परिषद ३०, ३१ मे १ व २ जून】
------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!