अण्णाभाऊ साठे: आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून...!!!




अण्णाभाऊ साठे: आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून...          
                                     लेखक :- सिद्धार्थ शिनगारे 
---------------------------------------------------


         अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्यावर आंबेडकरी विचारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. त्यांनी 26 कथासंग्रहा मधून जवळपास 300 कथा, 40 कादंबऱ्या, 15 लोकनाट्य, नाटक, लेख, शाहिरी, गाणे, लावणी, इत्यादी...असे विपुल प्रमाणात अण्णाभाऊंचे साहित्य प्रकाशित आहे. हे ललित लेखन नाही किंवा नुसता शब्दांचा फुलवरा नाही तर अस्सल जिवंत साहित्य त्यांच्या अनुभवातून त्यांनी मांडलेले आहे...
    

   A) त्यांनी लिहिलेल्या आंबेडकरी कथा
1)बुद्धाची शपथ: ही आंबेडकरवादी कथा आहे. जातीव्यवस्था आणि अस्पृश्यते विरोधात बाबासाहेबांनी धर्मांतर केले होते. त्या धर्मांतराचा प्रभाव, गाव खेड्यातील महार जातीवर खोलवर पडला होता. बौद्ध धर्माने झालेला सकारात्मक बदल सूक्ष्म निरीक्षणाद्वारे अण्णाभाऊ मांडतात. आणि या कथेचा शेवट 'बुद्धम् शरणम् गच्छामि' या शब्दांनी करतात.
2)सापळा: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी चळवळीमुळे समाजामध्ये जे प्रबोधन झाले, याचे वास्तव दर्शवणारी ही कथा अण्णाभाऊंनी लिहिली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात 20 मार्च 1927 ला महाड येथील कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण ठराव पारित झाला.
           "मेलेली जनावरे ओढून टाकण्याच्या बाबतीत बहिष्कृत लोकांवर अवलंबून न राहता आपली आपणच व्यवस्था करावी " 
                या ठरावामुळे महारांणी मेलेली जनावरे ओढणे बंद केले. त्याचे तंतोतंत पालन गाव खेड्यात सुरू होते. त्यामुळे गावातील सवर्ण मंडळी बदला घेण्याची योजना बनवतात परंतु महार जातीचे लोक या सापळ्याला उत्तर देतात. अशी आंबेडकरी कथा अण्णाभाऊ लिहितात.
3)उपकाराची फेड: अण्णाभाऊ साठे यांची ही कथा भारतीय समाजव्यवस्थेतील एक भयाण वास्तव अधोरेखित करणारी आहे. अतिशूद्र समजल्या गेलेल्या, अस्पृश्य जातीमधील ‘अस्पृश्यता’ उपकाराची फेड या कथेतून अण्णा भाऊंनी चित्रित केली आहे. मळू महार, लखू मांग, शंकर चांभार आणि मन्या परीट ही चारही अस्पृश्य जातीतील माणसं. ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या धर्माच्या नावावर अन्याय अत्याचार होत आलेला आहे अशा ह्या अस्पृश्य जातीतील चौघांची ही कथा आहे. भारतातील जातीव्यवस्था क्रमिक असमानते वर उभी आहे, अशी जी बाबासाहेब आंबेडकर मांडणी करतात, त्या संदर्भात ही कथा आहे.
4)वळण: शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात, 21/22 मार्च 1920 ला माणगावच्या परिषदेत जे ठराव पारित झाले, त्यातील ठराव क्रमांक 10, “मेलेल्या जनावराचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे हा गुन्हा आहे. असे कायद्याने मानले जावे असा या सभेचा अभिप्राय आहे." नुसार महार लोकांनी जनावराचे मांस खाणे सोडले होते. “ नवती या संग्रहात ‘वळण’ या नावाची एक सुंदर दलित कथा आहे” अण्णाभाऊंनी लिहिली आहे. ज्यामध्ये महार लोकांनी मेलेल्या जनावराची मटन खाणे सोडून दिले होते, या घटनेचा परिणाम महार आणि मांगावर काय होतो, या संदर्भात ही कथा आहे.
5)कोंबडी चोर: खुळंवाडी या कथासंग्रहातील अण्णाभाऊं ची ही एक गाजलेली वरवर विनोदी वाटणारी पण आतून विषमतेवर प्रहार करणारी महत्वाची कथा आहे. स्वतंत्र भारतात आपण स्वतंत्र आहोत का असा मूलभूत प्रश्नही कथा उभा करते. अर्थात या कथेचा आशय ' यह आजादी झूठी है देश की जनता भूखी है', असा आहे.
6) सोन्याचा मणी: आपल्या मुलीकडे राहणारी एक म्हातारी दलित स्त्री, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला कशाप्रकारे मदत करते अशा आशयाची कथा आहे. मेल्यानंतर तोंडामध्ये सोने ठेवण्याची प्रथा आहे, त्या म्हातारीने एक सोन्याचा मणी त्यासाठी ठेवलेला असतो, परंतु बाबासाहेबांच्या चळवळीसाठी ती तो मणी देऊन टाकते. आंबेडकरी चळवळ ही कष्टकरी कामकरी आणि दलितांच्या त्याग आणि बलिदानावर उभी आहे, अशी या कथेतून अण्णाभाऊ मांडणी करतात.


B) अण्णाभाऊंच्या साहित्यातील आंबेडकरांचा लिखित स्पष्ट उल्लेख :
        अण्णाभाऊ साठे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पष्टपणे उल्लेख त्यांच्या लोकनाट्यात, कादंबरीमध्ये, कथेमध्ये आणि त्यांनी लिहिलेल्या लेखांमध्ये स्पष्टपणे दिसतो, 1946 ला निवडणुकीसाठी त्यांनी ‘देशभक्त घोटाळे’ नावाचे लोकनाट्य लिहिले त्यामध्ये ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ हे प्रसिद्ध कवन गायले, 1958 ला त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ या बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वर्तमानपत्रात ‘दलित शाहिरी’ या मथळ्याखाली एक लेख लिहिला यामध्ये बाबासाहेबांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. त्यांची उत्कृष्ट कादंबरी फकीरा ही 1959 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. अण्णाभाऊंनी, ‘बुद्धाची शपथ’ कथा लिहिली. ज्यामध्ये बाबासाहेबांचा स्पष्टपणे उल्लेख आहे. ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा व जातवास्तव’ हा लेख, ‘युगांतर’ मधून प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये बाबासाहेबांचा स्पष्टपणे उल्लेख आहे. 
खालील लिखाणामध्ये स्पष्टपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख सापडतो 
1) देशभक्त घोटाळे, लोकनाट्य 1946 
2) दलित शाहिरी, लेख 1958
3) फकीरा कादंबरी 1959
4) बुद्धाची शपथ, कथा 
5) संयुक्त महाराष्ट्राचा लढा व जातवास्तव, हा लेख


C) बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंची प्रत्यक्ष भेट:
1) रमेश राक्षे यांनी "लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे गौरव ग्रंथ", बार्टी, पुणे यांनी जो ग्रंथ प्रकाशित केला त्यामध्ये "ये आझादी झुठी है " या शीर्षकाखाली लेख लिहिला आहे. "1942 साली 17 जूनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे अखिल भारतीय अधिवेशन भरविले. त्यात सुमारे पन्नास हजार पुरुष व 25 हजार स्त्रिया असे 75 हजार लोक उपस्थित होते. याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय पातळीवर शक्तिप्रदर्शन करून ब्रिटिशांवर दबाव आणण्याचा व त्याद्वारे आपले हक्क अधिकार मिळविण्याचा जोरदार प्रयत्न केला. (या अधिवेशनाला अण्णाभाऊ साठे उपस्थित असल्याचे पुरावे मिळत आहेत. असे लिहिले आहे, पुढे एका भाषणात रमेश राक्षे यांनी ' लोकशाहीर ही पदवी अण्णाभाऊंना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली असे म्हटले आहे.
2) डॉ.बाबुराव गुरव यांनी ‘लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे गौरव ग्रंथ’, बार्टी, पुणे, प्रकाशित ग्रंथामध्ये, ‘लोकशाहीर आणि क्रांतिसिंह’ या लेखामध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली असे लिहितात. “अण्णाभाऊ साठे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत्यक्षाची पहिली भेट 1949 साली मुंबईत झाली. अण्णाभाऊ, 1940 पासून बाबासाहेबांना पाहत होते. ऐकत होते. अण्णा भाऊंनी आपली सर्वश्रेष्ठ कादंबरी "फकीरा" डॉ.बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली. अण्णाभाऊंच्या मनावर बाबासाहेबांच्या महानिर्वाणाची घटना कधीही भरून न येणारी जखम करून गेली. असे लिहितात.
3) खुशाल खडसे यांनी ‘शब्द साहित्य का निर्माता अण्णाभाऊ साठे’ नावाचे हिंदी मधून पुस्तक लिहिले, ते लिहितात "कई बार बाबासाहब एवं अण्णाभाऊ इनकी मुलाखत के बारे में पाठक अनभिज्ञ रहते हैं ! डॉ.बाबासाहेब आंबेडकर और अण्णाभाऊ की मुलाकात कब हुई? ऐसे कई सवालात उठाते हैं ! मजदूर सभाओं (ट्रेड यूनियनों) कम्युनिस्ट, देशभक्ति आदि विषयों पर उनके भाषण या तो छापने नहीं दिए जाते थे या एकदम तोड़ मरोड़कर छापे जाते थे ! इसका आंशिक कारण राजनीति रहा है और आंशिक पुराने परंपरागत मिथ्था विश्वास ! मगर उसका जवाब हां है ! आण्णाभाऊ आंबेडकरी विचारों से सिर्फ प्रभावित ही नहीं बल्कि उनकी विचारधारा उसी प्रवाह में थी !
डॉ बाबासाहेब आंबेडकर और आण्णाभाऊ आंठ बार मिलने तथा उनके चर्चा के प्रसंग दिखाई देते हैं ! इसका एक उदाहरण यानी नागपुर का प्रसंग ! 20 अप्रैल 1952 में नागपुर के धंतोली एरिया में मेहाडिया चौक में जहां आज यशवंत स्टेडियम खड़ा है, वहां मजूर पक्ष की सभा हुई ! उस सभा के डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष थे तो आण्णाभाऊ प्रमुख अतिथि थे ! साथ में उस समय के युवा कम्युनिस्ट कार्यकर्ता ए.बी.बर्धन भि थे ! मजुर पक्ष का लाल झंडा और कम्युनिस्ट पक्ष का लाल झंडा इसका संगम हुआ था ! कार्यक्रम के पश्चात आण्णाभाऊ और बाबासाहब के भोजन का आयोजन लक्ष्मण भावे और अन्य साथियों ने किया था ! वह आज भी साक्षी के रूप में जिंदा है!
असे लिहितात.
 यावरून हे स्पष्ट होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची भेट झालेली आहे.


D) निष्कर्ष
1) अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी होते.
2) अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती.
3) अण्णाभाऊ साठे पहिले 'आंबेडकरी कथालेखक' आहेत.
4) कम्युनिस्ट विचारधारा भारतातील जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या दृष्टीने अपुरी आहे. याची जाणीव अण्णाभाऊंना होती.
5) कथा आणि कादंबरीतून जाती व्यवस्थेमधील खालच्या स्तरातील वेगवेगळ्या जाती मधून नायक शोधण्याचे कार्य अण्णाभाऊंनी केले. इतर जातींनी बदलाची, परिवर्तनाची, प्रगतीची, क्रांतीची प्रेरणा घ्यावी असे अण्णाभाऊंना वाटत होते 
6) अण्णाभाऊंनी फक्त स्वतःच्या जातीच्याच नव्हे तर समदुःखी जाती समूहांच्या दुःखाला वाचा फोडली.
7) अण्णाभाऊंनी बुद्धाची शपथ कथा लिहून एक प्रकारे 'स्वयंप्रकाशित व्हा' हा मार्ग दाखवला.
8) अण्णाभाऊ, 'जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भीमराव' या कवना द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्गच जग बदलू शकतो,असे ठामपणे मांडतात.
9) अण्णाभाऊ साठे फकीरा कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण करून, बाबासाहेबांच्या लेखणीला झुंजार उपाधी देऊन, संघर्ष करा, लढा द्या हा बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग दाखवतात. 
10) अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणारे आहे. 
समारोप
अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी, कथा, लोकनाट्य, शाहिरी आणि विविध लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला आहे. आंबेडकरी चळवळीचा अभ्यास ते 1942 पासून करत होते. 1956 नंतर ते आंबेडकरी चळवळीकडे वळाले, 1966 पर्यंत ते कम्युनिस्ट चळवळीमध्ये होते. शेवटचे तीन वर्ष त्यांनी कम्युनिस्ट पक्षासोबतचे अथवा कलापथका सोबतचे सर्व संबंध तोडले. अण्णाभाऊ ख-या अर्थाने मानवतावादी होते. आयुष्यभर त्यांनी तत्वाशी तडजोड केली नाही. त्यांचे संपूर्ण साहित्य हे ‘विद्रोही साहित्य’ आहे. शोषित, वंचित, कष्टकरी, दलित, शेतकरी, कामगार, गुन्हेगारी जाती, भटक्या जाती जमाती, यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी साहित्य लिहीले. या सर्व समूहाचे अण्णाभाऊ कैवारी होते.
आज त्यांच्या स्मृतीदीना निमित्त अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 

सिद्धार्थ शिनगारे सर...✍️💗
अध्यक्ष : भारतीय हितकारिणी संघ 
(लेखक, 'अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून', या पुस्तकाचे )

-----------------------------------------------------------------------------------


2] अण्णाभाऊ साठे...❤️


कामगार,कष्टकरी,शेतकरी,श्रमिक,मजूर,दलित/वंचित आणि दिनदुबळ्यांचे प्रश्न आणि कष्टमय जीवन आपल्या साहित्यातून मांडणारे अण्णाभाऊ साठे हे अनेक बाबतीत महान ठरतात.फक्त दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊंनी ३५ कादंबऱ्या,१३ कथासंग्रह,८ पटकथा,१ प्रवासवर्णन,३ नाटके,१० पोवाडे व १४ लोकनाट्ये आणि १२ उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ लिखाण करून समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलंय...

अण्णाभाऊ साठे यांचे जीवन एकंदरीत खूपच संघर्षमय-कष्टमय होते.संघर्षाचे जणू दुसरे नावच अण्णाभाऊ साठे होते असे आपण म्हणू शकतो. कारण त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष हा शब्दांत मांडता येण्यासारखा नाही.दुःख -वेदना जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या होत्या..दुःखाची सुद्धा एक मर्यादा असते पण अण्णाभाऊच्या आयुष्यात ही म्हण अजिबात लागू होत नाही जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या मागे दुःख हे लागलेलेच होते.संघर्ष हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते.त्यांचे एकंदरीत जीवन हे जीवन नसून मरणच अधिक होते.आणि त्यांचे दुःख हे शेवटी त्यांच्या मृत्यूसोबतच संपले. आयुष्यात कधीही खऱ्या संघर्षाची जाणीव करून घ्यायची असेल किंवा संघर्ष म्हणजे नेमके काय ?या प्रश्नांच उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एकदा फक्त अण्णाभाऊ साठे अभ्यासून पाहावे.❤️

प्रत्येक माणसाला मुक्तपणे जगता यावे यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.आपली व आपल्या कुटुंबाची काळजी न करता त्यांनी फक्त समाजातील दिंनदुबळ्यांबद्दल विचार केले. कारण त्यांनी समाजातील या दिंनदुबळ्यांचे कष्टमय जीवन हे अगदी जवळून पाहिले व अनुभवले होते.यांचे संताप,चीड, दुःख,यातना हे सर्व अण्णाभाऊना स्वतःचेच वाटत असे आणि यांचीच व्यथा त्यांच्या साहित्यात उतरली होती.त्यांचे लिखाण हे काल्पनिक नसून वास्तविकतेला धरूनच होते.त्यांच्या लेखणीने कामगार,कष्टकरी,गरीब वर्ग हा एकंदरीत पेटून उठायचा.त्यांचा लढा हा जातीयभेद-वर्णभेद-वर्गभेद,


गरिबी-बेरोजगारी आणि शोषणाविरुद्ध होती.
अण्णाभाऊंना विषमतेवर आधारित समाज व्यवस्था नको होती तर त्यांना समता हवी होती. आणि यासाठीच त्यांचा संघर्ष हा शेवटपर्यंत सुरू होता.अवघं ४८ वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या साहित्यरत्नाने आपल्या आयुष्यात जे काही लिखाण केलं ते फक्त आणि फक्त झोपलेल्या समाजाला जागवण्यासाठीच.त्यांनी केलेले लिखाण आज अनेकांना प्रेरणा देऊन संघर्ष करण्यासाठी,शोषण व अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला प्रेरित करत असतो आणि हीच त्यांच्या साहित्याची ताकद आहे जी दीर्घकाळ टिकणार यात तिळमात्र शंका नाही.

अण्णाभाऊ आज सुद्धा त्यांच्या साहित्यात जीवंत आहे आणि नेहमी राहणार आहेत.
अण्णाभाऊंच्या जन्मापासून तर त्यांच्या शेवटपर्यंत दृष्टिक्षेप टाकल्यावर लक्षात येते की त्यांचे एकंदरीत जीवन हे किती पटीने संघर्ष व दुःखमय होते..जे वाचून-ऐकून माणूस अक्षरशः रडल्याविना राहूच शकत नाही.त्यांच्या जीवनचरित्रापासून आपण खूप काही शिकू शकतो.अण्णाभाऊ साठेचा जन्म,कष्टमय बालपण,बालपणातील कष्ट,शिक्षणासाठी समाजाने उभी केलेली अडचण,दारिद्र्य-गरिबी,शिक्षण सोडणे,गाव सोडून कुटुंबाच्या सोबत पायदळ मुंबई येथे प्रवास,मुंबईत सुरुवातीला मिळेल काम करणे व नंतर गिरणीत गिरणी कामगार,वाचन व लिखाणाची आवड निर्माण होणे व त्यासाठी केलेली मेहनत,मार्क्सवादी-कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव,लालबावटा पथक सदस्य,नवीन मित्र मिळणे,रशियाचा प्रवास,मुबलक लिखाण,उपेक्षा,एकटेपणा आणि शेवटी दुर्दैवी निधन पर्यतचा प्रवास वाचल्यावर अंगावर काटा येतो आणि धायमोकळून रडावं अस वाटायला होते.एवढ्या मोठ्या साहित्यसम्राटाची अशी उपेक्षा ही मात्र कदापिही सहन होत नाही आणि होणार नाही..💐🙏
विनम्र अभिवादन अण्णा ❤️

Moin K...✍️
-------------------------------------------------------------------------------------------


3] “जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते,तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते.आणि अनुभूतीला सहानभूतीची जोड नसेल,तर आपण का लिहतो याचा पत्ताच लागणे शक्य नाही. म्हणून मी लिहितांना सदैव सहानुभूतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो.कारण ज्यांच्या विषयी मी लिहितो,ती माझी माणसं असतात.त्यांची मुर्वत ठेवूनच मला लिहिणं भाग पडतं...
-अण्णाभाऊ साठे...✍️


इतक्या सोप्या शब्दांत अण्णाभाऊंनी स्वतचं वैचारिक विश्व उलगडून दाखवतानाच लेखकाची नाळ कुठे जुळलेली असावी आणि त्याच कर्तव्य काय असावं याचा धडा घालून दिलेला आहे आणि हे त्यांच्या वाचलेल्या मोजक्या कथांमध्ये मी पाहिलं आहे. त्यांची एखादी कथा वाचून सुद्धा बऱ्याच थियरी अश्याच मोडकळीस निघतील आजच्या academia चा फाजीलपणा बघता. त्याचसोबत ह्या वरील एका लहानश्या प्याराग्राफ मध्येच त्यांनी प्रतिभा शब्दासोबत माजलेले ब्राह्मणी अवडंबर सुद्धा निकाली काढलं आहे.
अण्णाभाऊंच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा...💞💓💐💐💐

-Rahul Gaikwad सर...✍️
------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!