डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाड सत्याग्रह: सामाजिक क्रांतीपासून चवदार तळ्याच्या न्यायालयीन विजयापर्यंतचा रणसंग्राम...!!!



1] डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (महाड सत्याग्रह)



१९२७ उजडला, मागील वर्षी जे अस्पृश्यता निवारनाचे वारे देशभर वाहू लागले होते त्याचं आता वादळात रुपांतर होण्यास सुरुवात झाली होती. जे संवर्ण या काळात गाफिल होते त्यांची झोप उडविणाच्या दिशेनी वाटचालु सुरु झाली. आता मनुच्या भिंतीना हादरे देणा-या अस्पृश्यांच्या सभाना उधान आले होते. जिकडे तिकडे एकच नाव, बाबासाहेब आंबेडकर. अन अशातच नविन वर्षाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील महारांच्याविजयस्तंभाला सलामी देऊन, अस्पृश्यांची एक मोठी सभा घेत नव्या दमाने चलवळीची सुरुवात करण्यात आली. या सभेत बाबासाहेबानी इंग्रजांवर ताशेरे ओढतांना त्यांच्या दुटप्पी धोरणावर तुफान बरसले होते. ज्या ब्रिटिशाना पेशव्यांच्या विरोधात लढाईत विजयी मिळवुन देण्यासाठी महार सैन्यानी रक्त सांडले होते त्या महाराना लष्करभर्ती बंदी घातल्याचा निषेध नोंदविण्यात आला. ब्रिटीशानी लगेच लषकरभर्ती बंदी उठविली नाही तर त्यासाठी वेगळा सत्याग्रह करण्याचा संकेतही देऊन टाकला.

बाबासाहेबांचा प्रभाव भारतीय राजकारणात वाढू लागला होता. संपुर्ण अस्पृश्य समाज बाबासाहेबांच्या पाठीशी उभा होता. लोकं त्यांच्या सांगण्यावरुन शेकडो मैलचा प्रवास करुन सभाना हजेरी लावत होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळ प्रचंड वेगाने पसरत होती. एकंदरीत त्यांचा वाढता प्रभाव बघून ब्रिटिश सरकारनी बाबासाहेबांची विधिमंडळात सदस्य(आजच्या भाषेत आमदार) म्हणून नेमणुक केली. या निमित्ताने फेब्रुवारी १९२७ ला अस्पृश्य समाजातील शिक्षकानी त्यांचा सत्कार करण्यासाठी मुंबईत एक सभा भरविली अन बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला. आता असे अनेक सत्कार समारंभ होऊ लागले. जिकडे तिकडे आंबेडकर नाव दुमदुमु लागले. याच सभेत कार्यकर्त्यानी बाबासाहेबाना पैशाची थैली अर्पण केली होती, अन ती थैली बाबासाहेबानी तशीच बहिष्कृत हितकारिनी सभेलाअर्पण केली.

बाबासाहेबांच्या चळवळीमुळे आता अस्पृश्यांचा आत्मसन्मान हळू हळून जागा होऊ लागला होता. लोकं रस्त्यानी चालताना मान वर करुन चालु लागली. या भुमीत हजारो वर्षानी हे पहिल्यांदाच घडत होतं. संवर्णांपेक्षा आपण कणभरही कमी नाही याची काही लोकाना जाणीव झाली अन ते जागृतीचं काम करत फिरु लागले. प्रत्येकाला आता गुलामगिरीची जाणीव होऊ लागली. आता सगळा समाज गुलामगिरी झटकून टाकायच्या तयारीला लागला होता. स्वत:च्या कार्यक्षमतेचा साक्षात्कार होऊ लागला. आता बंडखोर वृत्ती गुलामगिरीची जागा घेऊ लागली. या व्यवस्थेचा जनसामान्याना तिटकारा वाटू लागला. असे वाटणे परिवर्तनाची प्राथमिक अवस्था असते. एकूण अस्पृश्य समाज या अवस्थेला येऊन पोहचला होता. आता नवि क्रांती घडणे अटळ होते. पण ही सामाजिक क्रांती एकही रक्ताचा थेंब न सांडता घडावा यासाठी बाबासाहेबांनी चळवळीवर करडी नजर नि आंबेडकरी शिस्त या दोन्ही गोष्टींचा प्रभावी पहारा लावला होता.



याच दरम्यान महाड नगरपालिकेनी सिताराम केशव बोले यानी विधिमंडळात पास करुन घेतलेल्या ठरावाची अमलबजावनी करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णया प्रमाणे महाड नगरपालिने आपल्या अधिकारातील चवदार तळे हे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आल्याची घोषणा केली. ही घोषणा होताच अस्पृश्यांचा वस्तीत जल्लोष उडाला. आता चवदार तळ्याचे पाणी चाखता येईला या आनंदाने लोकांनी जणू उत्सव साजरा केला. कायद्याने बहाल केलेला अधिकार बजाविण्यासाठी महार वाड्यातुन बायका पोरी मडकी, हंडे घेऊन तळ्यावर पोहचली. पण मनुचे प्रतिनिधी फार कर्मठ. त्यानी महाराना तळ्यावरील पाणी घेण्यास मज्जाव केला. बिचा-या पिडित अस्पृश्यांमधे एवढा हिंमत कुठे होता की ठणकावून आपले हक्क बजावतील. संवर्णांची शिवीगाळ खाऊन माना खाली घालुन तमाम लोकं पाणि न घेताच परतली. झालेल्या प्रकारामुळे सगळा गाव खदखदत होता. ईकडे अस्पृश्य हक्क न मिळाल्यामुळे तर तिकडे संवर्ण अस्पृश्य माजलेत म्हणून धुसफुसत होते. आग दोन्हिकडे लागली होती. एका बाजूला अधिकारासाठी तर दुसरी मनुवादी वर्चस्व टिकविण्यासाठी. अन हा हा म्हणता ही बातमी बाबासाहेबांच्या कानावर पडली. बाबासाहेब अत्यंत विशिण्ण मनस्थीतीने सगळा प्रकार ऐकला. मन विदिर्ण झाले. हा संवर्णांचा घोर अपराध होता. ज्या तळ्यातील पाणी गुरा ढोरांसाठी उघडे होते, मुसलमान व ख्रीश्चनांसाठी उघडे होते. प्राण्या पक्ष्यांसाठी उघडे होते पण आपल्याच समाजातील अस्पृश्य बांधवाना मात्र हे पाणी नाकरण्यात आले होते. संवर्णांद्वारे अस्पृश्यांना तिथे अटकाव घालण्यात आला होता. हे सगळं ऐकून बाबासाहेब फार संतापले. आज कायद्यानी तो अधिकार दिल्यावर मनुवाद्यानी अटकाव करण्याचे काहीच कारण नव्हते. तरी वर्चस्वाची मस्ती इतकी होती की त्यातून यांनी हे प्रताप केले होते. या सगळ्या प्रकाराणे संतापलेल्या बाबासाहेबानी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला व त्या अनुषंगाणे घोषण केली. चवदार तळ्याचे पानी चाखणे हा अस्पृश्याना कायद्याने दिलेला अधिकार आहे व तो आपण कुठल्याही किमतीत बजावायचाच. आपण १९ व २० मार्च १९२७ ला महाडला चवदार तळ्याचे पाणी चाखण्यासाठी सत्यग्रह करणार असून, ते स्वत: तिथे जातीने हजर राहून आपला अधिकार बजाविणार अशी भीम गर्जना केली.


या भीम गर्जनेची डरकाळी देशभर गेली. लाखो लोकांच्या अंगात वीज चमकून जावी अन त्याला प्रतिसाद म्हणून देशभरातून भीम लाट उसळावी असा तो प्रकर होता. बाबासाहेब स्वत: तळ्याच्या सत्याग्रहात उतरताहेत म्हटल्यावर काना कोप-यातून कार्यकर्तेही उसळणार होते. या घोषणेतून तमाम कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुनीत झाला. जिकडे तिकडे लोकानी या चळवळीत भाग घेण्यासाठी तय्यारी चालविली. सुरभा टिपणीस, सुभेदार सवादकर, संभाजी गायकवाड, शिवराम जाधव, अनंतराव चित्रे, रामचंद्र मोरे या अस्पृश्य पुढा-यानी आपली सगळी ताकत एकवटुन गावोगावी प्रचार चालविला. लोकाना दोन दिवस महाड सत्याग्रहास हजेरी लावण्याचे सांगण्यात येऊ लागले. तमाम जनतेत बाबासाहेबांच्या या निर्णयामुळे एक जल्लोष उडाला होता. आज आपल्या महान नेत्याने पुकारलेल्या पहिल्या वहिल्या जाहीर लढाईत भाग घेण्याची संधी कोणीच गमवायला तयार नव्हता. बघता बघता १९ मार्च हा दिवस जवळ येऊ लागला. ही दरिद्र्यांची, पिचलेल्या, दबलेल्या लोकांची सभा होती. इतर कोणत्याही सभेपेक्षा ही सभा सर्वार्थाने वेगळी होती. येणारी लोकं हजारो वर्षाच्या काळोखात जिवन व्यथीत करुन स्वाभिमान हरविलेली, दिशाहीन, विद्याहीन, परिस्थीतीने दीन तर सामाजातील स्थानी अत्यंत हीन या सगळ्या अवस्थांतून जाणारी ही माणसं महाडात जमणार होती. येण्यासाठी हातात पैसे नव्हते म्हणून एक आठवडा आधीच पायी निघालेली कित्येक लोकं हळू हळू महाडला उतरत होती. बघता बघता १९ मार्च उजाडला अन हजारोच्या संखेनी पाठीवर भाकरीची शिदोरी बांधुन अस्पृश्यानी महाडला हजेरी लावली होती.

चवदार तळ्यापासून दोन फर्लांग अंतरावर एक विराट असे मंडप उभारण्यात आले होते. येथेच आमच्या अस्पृश्य बांधवांचा मुक्काम होता अन परिषदही ईथेच भरणार होती. गावातील संवर्णांमधे धुसफुस सुरु होतीच. अस्पृश्यांच्या अफाट लोकसमुदायाच्या लाटा बघुन त्यांचे धाबे दणाणले होते. ही चळवळ फसावी म्हणून तिथल्या संवर्णानी असहकार करायचे ठरविले होते. ईतक्या लोकाना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणणू लागली. ईतर वेळी मंदीरांच्या पुजेत किंवा इतर समाज कार्यात सढळ हातानी दाण करुन पुण्य कमविणारे संवर्ण आपल्याच बांधवांना मात्र पैशानीही पाणी देण्यास तयार नव्हते. शेवटी बरीच खटपट करुन ४० रुपये खर्ची घालुन पाणी घेण्यात आले. आलेल्यांची पाण्याची गरज भागली अन या सत्याग्रहाचा पहिला दिवस सुरु झाला. तो दिवस म्हणजे १९ मार्च १९२७ होता. या दिवशी महाड सत्याग्रहाची सभा नियोजित तंबुत सुरु झाली.

संभाजी गायकवाड हे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या भाषणाने परिषदेची सुरुवात झाली. पुढे बसलेली जनता ही फाटक्या कपड्याची, दारिद्र्यानी पछाडलेली व आत्मसन्मान गमावलेली होती. पण आज या परिषदेत हजेरी लावुन हे सगळं झिटाकरण्याची तयारी असल्याचा व माणूस म्हणून जगण्याचा निर्धार केल्याचा पुरावा देत होती. अशा या गरीब व शोषित बांधवांच्या सभेत सुरुवातीची काही भाषणं झाल्यावर बाबासाहेब भाषणास उभे राहतात. पांढरा शुभ्र बंगाली धोतर, सदरा व कोट असा त्यांचा पेहराव होता. बाबासाहेब उभं राहताच टाळ्यांच्या कडकडाटाने अख्खं मंडप दुमदुमलं. बाबासाहेबानी आपले भाषण चालु केले.
“आम्ही सरकारला नेहमी अनुकुल असतो म्हणुन आमची उपेक्षा होते. आपण नेहमी झुकतं माप घेतल्यामुळे आमचा कोणी विचारच करित नाहीत. महाराना लष्करभर्ती बंदी याचाच एक नमुना आहे. आपल्यावरील ही बंदी जरी ईथल्या संवर्णांच्या सांगण्यावरुन लादली असली तरी इंग्रजानी असं डोकं गहाण ठेवण्याचं मुख्य कारण ते नाही, तर आम्हीच आहोत. आपण आपल्या अधिकारासाठी केंव्हाच ठणकावून उभे रहात नाही म्हणून आपल्यवर आज ही वेळ आली आहे. सरकार जरी इंग्रजांच असलं तरी अधिकारीवर्ग मुख्य भुमिका बजावत असतो. तुम्ही आता शिक्षणाची कास धरा. सरकार दरबारी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून जा. अन आपल्या अधिकारांची अमलबजावणी करा. या महाडमधेच बघा ना, आज नगरपालिकेनी हे तळे आपल्यासाठी जरी खुले केले तरी आज आपल्याला ईथे अटकाव होतो. तेच जर आपले अधिकारी येथे वरिष्ठस्थानी बसलेले असते तर ही वेळ आलीच नसती. म्हणून आपला माणूस सरकार दरबारी वरिष्ठ पदावर असणे गरजेचे आहे. ४ थी शिकलेल्या ४० जणांपेक्षा बी. ए. झालेला एक माणुस मला जास्त महत्वाचा वाट्तो. म्हणून सगळ्यानी जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा निर्धार करावा. मृत जनावरांचे मांस खाणे आता सोडुन दया. महाराना गावात इज्जत नाही कारण आपल्यात स्वाभिमान नाही. स्वाभिमानाने जगायला शिका अन पोरा बाळाना शाळेत धाडा. महारानी आता वतनाचा लोभ सोडुन दयावा अन शेतीकडे वळावे. जंगलातील शेती मिळवावी अन स्वत: पिकविणारा अन्नदाता बनावे.” अशा प्रकारचं महारांमधे नवचैतन्य भरणारं एक जबरदस्त भाषण देऊन त्या दिवसाची सभा संपली.



त्या रात्री बाबासाहेब व इतर कार्यकर्ते टिपणीसांच्या घरी बसून दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवित होते. दुस-या दिवशी गावातील काही पुढारी जे स्वत:ला पुरोगामी समजतात ते परिषदेस हजेरी लावणार होते. या पुढा-यांच्या मदतीने ऐन वेळेवर तळ्याचे पाणी चाखण्याचा प्रस्ताव पुढे करुन तळ्यातील पाणी पिण्याचं ठरलं. महाड नगरपालिकेच्या ठरावाला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा एकंदरीत आराखडा तयार झाला.
दुस-या दिवशी परिषद सुरु झाली. गावातिल पुरोगामी पुढारीही ठरल्या प्रमाणे आलेत. त्याना मोठया तो-यात भाषणही ठोकही. आम्ही कसे सुधारनेला पांठिंबा देत आहोत हे त्यानी आपल्या भाषणात ठणकावुन सांगितले. पण काही तासांतच त्याना प्रत्यक्ष कृतीतुन हे सिद्ध करण्याचं आव्हान पुढे उभं ठाकेल याचा अंदाज नव्हता. आपला भोपळा ईथेच फुटणार याची जाणिव नसल्यामुळे वाट्टेल ते ठोकम ठाक चालू होतं. दुपार पर्यंत सगळ्यांची भाषणे संपली अन त्या अनुषंगाने आजुन नविन ४ ठराव या परिषदेत पास करुन घेण्यात आलेत. अन आता परिषदेचे कामकाज संपणार अशी घोषणा होत असतानाच ठरल्या प्रमाणे व पुर्व संकेतानी अनंतरव चित्रे ताडकन उठुन “आपण महाड नगरपालिकेचा ठराव अमलात आणू या” अशी गुगली टाकली. हे वाक्य ऐकुन परिषदेस कोसो दुरचा पायी अंतर कापून आलेला प्रत्येक अस्पृश्य सुखावला अन टाळ्यांचा कडकडाट झाला.

याच्या अगदी उलटं स्पृश्य नेत्यांचे मात्र धाबे दणाणले. त्यानी या प्रत्यक्ष कृतीस नकार दिला. यामुळे संवर्णाचा रोष ओढवुन घेण्याची त्यांची तयारी नव्हती. लोकांच्या मताच्या विरोधातजाऊन काहिही करण्याची त्यांची तयारी नव्हती. महारानी तळ्याला हात लावल्यास संवर्ण उठाव करतील याचा त्याना अंदाज होता. त्यानी वेळ साधुन मागच्या दारातुन पळ काढला व आता काहीवेळापुर्वी भाषणातुन अस्पृश्य निवारणाच्या ज्या बढाया मारल्या त्या उघड पडल्या. परत एकदा अस्पृश्यांच्या प्रश्ना बद्दल पुरोगामी म्हणविणा-या लोकांमध्ये असलेले ढोंग बाहेर पडले. अगदी असेच ढोंगी तिकडे गांधीच्या ऐसपैस गोळा होऊन येणा-या काळात हरिजन चळवळ उभी करतात व तमाम अस्पृश्यांची दिशाभूल करतात. म्हणून बाबासाहेब नेमहीच म्हणायचे की दाईच्या हाताचा व आईचा हाताचा स्पर्श वेगळा असतो.



तर पुरोगामित्वाचा आव आणणारी तमाम मंडळी धूम ठोकल्यावर ठरल्या प्रमाणे वरील सगळी सत्याग्रही मंडळी बाबासाहेबांसोबत तळ्याच्या दिशेन कूच करतात. त्यांच्या मागून अस्पृश्य समाजाचा जनसमुदायही तळ्याच्या काठावर येतो. बाबासाहेब पुढे होऊन तळयातील पाणी ओंजळीत धरतात. तेंव्हा ते ओंजळीतले पाणी पाहुन त्यांचे डोळे पानावले. ओंजळभर पाणी घेऊन बाबासाहेब म्हणतात "हे तेच पाणी...., जे सगळ्या प्राणिमात्रांना, कुत्र्या मांजराना व गुरा ढोराना उघड आहे पण मला व माझ्या बांधवाना याचा स्पर्श एवढे वर्ष वर्ज होता. मात्र मी याला नुसता स्पर्श करणार नाही तर हे प्राशन करतो" असे म्हणत त्यानी ओंजळीतले पाणी प्राशन केले. अन आपल्या समस्त बांधवांसाठी हे तळे आजपासुन खुले आहे, तो आपला अधिकार आहे सगळ्यानी पाणी प्यावा असे आवाहन करताच लोकानी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली अन आज चवदार तळ्याचे पाणी चाखले. हा पाणी चाखण्याचा दिवस होता २० मार्च १९२७.... हा खरा खुरा सोन्याचा दिवस होता. म्हणायला जरी ही पाण्याची गोष्ट असली तरी पाणीशी काही देणेघेणे नव्हते. हा आत्मसन्मानाचा प्रश्न होता. गायी ढोरांपेक्षा खालचा दर्जा समाजानी लादला तो झुगारण्याचा लढा होता. माणूस म्हणून स्वत:चं अस्तित्व दाखविण्याचा लढा होता. तो लढा आजवर कधीच लढला गेला नव्हता. कारण त्याची जाण करवून देणारा पैदा व्हायचा होता. आज मात्र तो भीम ईथे लढा उभारायला जातीने आला होता व ईथून पुढे निळ्या क्रांतीचा नवा इतिहास घडणार होता. येणा-या निळ्या चळवळीची ही पहिली डरकाळी होती. ती अशी सुरु झाली.

तर... तळ्याती पाणी पिल्यावर परिषद संपल्याची व यशस्वी झाल्याची घोषण होते अन सगळे अस्पृश्य आपापल्या गावाच्या दिशेने निघतात. बाबासाहेब दोन दिवसापासुन सरकारी डॉक हाऊस मधे मुक्कामी होते. बरीच लोकं मिळेल त्या वाहनानी गावाकडे निघाले. कित्येक लोकंतर पायीच निघाली. पण ज्यांचा दुरचा प्रवास होता किंवा सायंकाळी वगैरे गाडी धरायची होती अशी लोकं आजुन त्या तंबुतच होती.
इकडे मात्र महारानी तळे बाटविल्याची बातमी गावात विस्तवासारखी पसरली. महार नुसतं तळे बाटवून शांत बसणार नाहीत तर ते आता गावातील वीरेश्वर मंदीरातही प्रवेश करणार अशी अफवा पसरविण्यात आली. चहुकडे धर्मावर घाला घातल्याची वार्ता पसरत होती. आंबेडकरानी धर्मावर घाला घातल्याच्या बातमिने सगळा संवर्ण समाज पेटुन उठला. लाठ्या काठ्या घेऊन हिंदु लोकं तळ्याकाठच्या मंडपात धडकले. आता तशिही मंडपात फारशी लोकं नव्हतीच. होते ते निघून गेले होते. उरले सुरले लोकं गावत गेले होते. बायका व मुलं फक्त मंडपात होती व जोडीला काही पुरुष मंडली होती. निघायच्या तयारीत असणारा बांधव आवराआवरी करत होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निहत्ता होता. पण याच्या अगदी उलट बाटविल्याचा बदला घेण्यासाठी आलेला संवर्ण सामाज मात्र खवळलेला तर होताच पण मारापिटी करण्याच्या जय्यत तयारीनेच आला होता. निहेत्ते लोकांना पाहून त्याला अजुन जोर चढला व तंबूत बसलेल्या अस्पृश्यांना बेदम मारहाण सुरु झाली. दिसेल त्याला फोडून काढले जाऊ लागले. मुला बायकांच्या किंकाळ्या गुंजू लागल्या. सगळ्याना पळपळू मारणे सुरु झाले. पुरुषांना तर मातीत लोळवू लोळवू मारायला लागले. लाथा बुक्या व लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाणी सुरु झाली. तिथे उपस्थीत पुरुषांची डोकी फुटोस्त्वर मारण्यात आले. सभा मंडपात जिकडे तिकडे अस्पृश्यलोकांची दाणादाण उडविण्यात आली. शिजत असलेल्या अन्नात वाळु मिसळण्यात आली. तळ्याच्या शेजारी रक्ताचा लोट वाहु लागला. चवदार तळ्याचे पाण्य आता महारांच्या रक्ताने लाल होऊ लागले. कित्येक लोकानी मुसलमान बांधवांच्या घरात शिरुन त्यांची मदत घेतली व आपला जीव वाचविला. अशा प्रकारे अमानुष मारहाण करुन संर्वर्णानी पळ काढला.



तिकडे बाबासाहेब डॉक बंगल्यात या सगळ्या घटनेपासुन अनभिज्ञ, परिषद सफल झाल्याच्या आनंदात होते. पण काही क्षणातच ईथे घडलेला सगळा प्रकार बाबासाहेबाना कळविण्यात आला. बाबासाहेबानी कार्यकर्त्यासकट थेट सभा मंडपात धाव घेतली. बघतात काय तर, जिकडे तिकडे घायाळ अवस्थेत पडलेले आपले बांधव दु:खानी किंचाळत होते. हे सगळं दृश्य पाहुन बाबासाहेब अत्यंत संतापले. पण ही वेळ रागावण्यात घाविण्याची नव्हती. जखमिना दवाखान्यात नेण्यात आले. बाबासाहेबानी स्वत: २० घायाळाना दवाखान्यात दाखल केले. तिथेही संवर्णच होते. हे संवर्ण डॉक्टर त्यांच्य पेशाला न शोभणारे शेरे मारत होते. पाणी हवे होते, घ्या आता इंजेक्शन. खुप माजलात तुम्ही त्या आंबेडकरांमुळे असले टोमणे व हिणकस शेरे मारत उपचार केला.

बाबासाहेबाना त्याच सायंकाळी डॉक बंगला खाली करुन दयायचा होता. त्यातच ही हाणामारी व अनेक जण जखमी झाल्यामुळे त्यानी आजुन दोन दिवस ईथेच थांबुन आपल्या बांधवांची काळजी घेण्याचे ठरविले. सायंकाळी मामलेदर व पोलिस अधिकारी डॉक बंगल्यावर बाबासाहेबांची भेट घेतली. झालेल्या प्रकरणा बद्दल दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब मुद्दा पेटवतील की कसे याचा अंदाज येत नव्हता. त्यांनी तशी चिंता व्यक्त करुन दाखविली. तेंव्हाचे बाबासाहेबांचे वाक्य आहेत “मला झगडा पेटवायचा नाही. तुम्ही इतराना आवरा, मी माझी माणसे आवरतो.” ही प्रगल्भता, ही समयसुचकता व दाखविलेला संयमबाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्वाचं दर्शन घडविणारं तर होताच. पण येणारा लढा मैदाना हातघाईने नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाने देशव्यापी होणार नि नव्या क्रांतीची पहाट होईस्तोवर लढल्या जाणारा याचाही संकेत होता. स्वभावातील काही गोष्टी भविष्याची नांदी देत असतात. इथे बाबासाहेबांनी दाखविलेला संयम अधीच जोमाने लढण्याचा संकेत सोडून गेला.

ईकडे डॉक बंगल्यावर लोकांची गर्दी वाढु लागली. हजारोनी गावाच्या दिशेनी जायला निघालेली पाऊले बातमी कळताच महाडच्या दिशेनी परत फिरली. महारांनी आज उभ्या महाडला मनगटातील पाणी पाजण्याचा निर्धार केला होता. अख्या संवर्णाना महाराच्या बाहुंचा बळ काय असतो ते दाखविण्याची तयारी होऊ लागली. सभा मंडपात मोठा विस्फोट आकार घेऊ लागला. एक छोटासा अविवेक महाडला भस्म करु शकत होता. पण बाबासाहेब मात्र फार संयमी. खरंतर बाबासाहेब स्वभावाने प्रचंड तापट व्यक्ती होते, पण ते अविवेकी नव्हते. शिघ्रकोपी असणे नि विवेकी असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. अन बाबासाहेबांत त्या दोन्ही गोष्टी होत्या. विवेक नेहमीच तापटापणाला नियंत्रणात ठेवत असतो. ईथे आज अटीतटीची वेळ निर्माण झाली होती व अख्या महाडला राख करण्यासाठी भीमसेना सज्ज होती. पण बाबासाहेबांनी अत्यंत विवेकाने वागत सगळ्या कार्यर्त्याना धीर धरण्याचा व संयमाने वागण्याचा सल्ला दिला. भडकलेले कार्यकर्ते मात्र त्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करतात. आज आपण संखेने अधिक आहोत व काही मिनटात संवर्णानी पाणी पाजण्याची तय्यारी आहे तेंव्हा तुम्ही तशी परवानगी का नाकाराता? असे काही कार्यकर्यानी विचारले तेंव्हा बाबासाहेबांमधील दुर्दर्शी व संयमी पुरुष बोलतो.
ते म्हणतात "तुम्ही नुसतं महाडवर तुटून पडण्याचं बोलताय, मी उभ्या भारतावर तुटून पडण्याचा कार्यक्रम आखलाय. तुम्ही त्या परीने तयारीला लागा. राहिला प्रश्न ईथल्या हल्लेखोरांचा. त्याना आपण कायद्यानी धडा शिकवूया. काही लढाया जग्यावर लढल्याच पाहिजे हे जरुरी नसते. त्या देशव्यापी करत नेऊन अशा पद्धतिने लढायच्या असतात की शत्रूला माघार घ्यायला जागा उरायला नको. नुसतं एका तळ्याचा लढा नाहीये. हा लढा आता इतका व्यापक करत न्यायचा आहे की सारी भारत-भू च एक तळे बनायला हवे. निव्वड महाड्च्या संवर्णाना धडा शिकवायचा नाही तर तमाम भारतीय संवर्णाना आता आमचा अधिकार मान्य करायला भाग पाडायचे आहे" असं म्हणून बाबासाहेबांनी भडकलेल्या समाजबांधवांची समजूत काढली व त्यांना शांत केले.यानंतर लोकं शांत होतात अन एकदाचं मोठं संकट टळलं.


आता कार्यकर्त्यानी परत एकदा महाड सोडण्यास सुरुवात केली. पण बाबासाहेब मात्र महाड सोडून जात नाहीत. त्यांची डॉक बंगल्याची मुदत संपल्यामुळे ते टिपणिसांकडे मुक्काम हलवितात. अन सगळा मामला शमवून नि मार्गी लावून २३ मार्च १९२७ ला मुंबईस परत येतात.
दरम्यान तमाम हल्लेखोरांवर खटले भरण्यात येतात व केस चालविली जाते. या खटल्यात ८ जातियवादी गुंडावर आरोप सिध्द होतो. ६ जुन १९२७ ला न्यायालयाचा निकाल येतो, अन त्या प्रमाणे वरील सर्व आरोपिना प्रत्येकी ४ महिन्यांचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात येते. परत एकदा अस्पृश्यांच्या वस्तित जल्लोष होतो.....

-Adv:एम डी रामटेके....✍️
---------------------------------------------------------------------------------



2] चवदार तळ्यावरील बंड, खटला आणि बॉम्बे हाय कोर्ट...!!


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे येथे सुरू केलेल्या चळवळीला ' बहीष्कृत वर्गाचे बंड ' (Revolt) असे संबोधन केले. ते लिहितात,
" The movement of the Untouchables against the injustice of the Hindu 
Social Order has a long history behind it, especially in Maharashtra. This history falls into two stages. The first stage was marked by petitions and protests. The second stage is marked by open revolt in the form of direct action against the Hindu Established Order. "
सुरुवातीच्या काळातील निवेदने-निषेध इत्यादी ते बंड direct action, हा जो कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल झाला, त्याची कारणमीमांसा बाबासाहेब अधोरेखित करताना, दोन कारणे सांगतात,
" This change of attitude was due to two circumstances. In the first place it was due to the realization that the petitions and protests had failed to move the Hindus. In the second place Governments had declared that all public utilities and public institutions are open to all citizens including the Untouchables. The right to wear any kind of clothes or ornaments are some of the rights which the British Indian Law gives to the Untouchables along with the rest. To these were added the rights to the use of public utilities and institutions, such as wells, schools, buses, trams, Railways, Public offices, etc., were now put beyond the pale of doubt. "


महाड येथेच बंडाचे निशाण रोवण्याचे बाबासाहेबांनी बैठकीत तीन कारणासाठी निश्चित केले. पहिलं कारण महाड हे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी रायगड परिसरात वसलेले होते, दुसरे कारण तिथे बुद्ध लेणी होती आणि तिसरे कारण म्हणजे१९२३ साली मुंबई विधान सभेत ठराव करण्यात आला होता, की
" In 1923 the Legislative Council of Bombay passed a resolution to the effect that the Untouchable classes be allowed to use all public watering places, wells, 
Dharmashalas which are built and maintained out of public funds, or are 
administered by bodies appointed by Government or created by Statutes 
as well as public schools, courts, offices and dispensaries...."


सरकारने हा ठराव स्वीकृत करून आदेश दिला की,
"Government accepted the resolution and issued the following orders:
“In pursuance of the foregoing Council Resolution the Government of Bombay are pleased to direct that all heads of 
offices should give effect to the resolution so far as it related to the public places, institutions belonging to and maintained by
Government. The Collectors should be requested to advise the local bodies in their jurisdiction to consider the desirability of accepting the
recommendations made in the Resolution.”
या आदेशास अनुसरून अनेक ठिकाणी आणि विशेषकरून महाड नगरपालिकेने ५ जानेवरी १९२४ रोजी ठराव पारित करून स्पष्ट केले की सार्वजनिक पाणवठ्यावर बहिष्कृत वर्गाला देखील पाणी घेण्याचा अधिकार आहे.




महाड सत्याग्रह
हे सगळे ठराव केवळ कागदावरच होते. त्याची अंमबजावणी करण्यासाठी कोणी धजावत नव्हतं. कोणी पुढे आलेच तर त्याला बेदम मारून दहशतीत जगायला भाग पाडले जायचे. आणि म्हणून हे बंड पुकारले होते, ही क्रांती होती. कायदे, नियम, अधिनियम इत्यादी कितीही पुरोगामी असले, तरी त्यावर, जर व्यक्तीला action घेता येत नसेल, तर त्याचा काहीही उपयोग नसतो आणि जेंव्हा मानवी मूलभूत अधिकारांना सर्व समाज मिळूनच विरोध करत असेल तर ? मग कोणतीही संसद, विधानसभा, कायदा , संविधान आणि न्यायपालिका त्या मानवी मूलभूत अधिकारांची हमी देऊच शकत नाही. बाबासाहेब एडमंड बर्क चे वक्तव्य अधोरेखित करतात, की
"...As Burke said, there is no method found for punishing the multitude. Law can punish a single solitary recalcitrant criminal. It can never operate against the whole body of people who choose to defy it. Social conscience is the only safeguard of all rights, fundamental or non-fundamental. "
महाड सत्याग्रहात समस्त भारतीय व्यक्तींच्या सदसद्‍विवेकबुद्धीला आवाहन देण्यात आले होते. ती direct action होती. १८ आणि २० मार्चला पहिली परिषद, महाड मुक्कामी चवदार तळ्यावर धर्म संगर घडला. मारहाण झाली. अफवा पसरविल्या गेल्या.
आणि म्हणून पुनश्च एकदा २५,२६,२७ डिसेंबर रोजी दुसरी महाड परिषद बोलाविण्यात आली.


तथापि जेंव्हा दुसऱ्या परिषदेचा दिवस नजिक आला तेंव्हा बहिष्कृत वर्गाच्या मागील बंडामुळे महाड गावातील सनातन्यांनी कुलाबा जिल्हा कलेक्टर यांस निवेदन दिले की फौजदारी प्रक्रिया संहिते (Criminal Procedure Code) नुसार ऑर्डर काढून कलम १४४ लागू करण्यात यावं आणि या अस्पृश्य वर्गाला तळ्यात जाण्यापासून आणि पाणी बाटविण्यापासून मज्जाव करण्यात यावा. कलेक्टरने नकार देत स्पष्ट सांगितलं की सदर तळे सार्वजनिक असून तिथे बहिष्कृत वर्गाला जाण्यापासून मी रोखू शकत नाही. पण हो तुम्हाला जर ' right of exclusive user ' सांगायचा आहे तर मग कोर्टात जाऊन ऑर्डर घेऊन या, असा कलेक्टर महोदय यांनी सल्ला दिला. तेंव्हा महाड गावात बैठक होऊन विविध जातीतील ९ जण वादी म्हणून (plaintiff) निवडण्यात आले, आणि civil suit number 405/1927 दाखल करण्यात आला. खुद्द बाबासाहेब आंबेडकर आणि इतर चार जण असे एकूण पाच प्रतिवादी (defendant) होते.


या दिवाणी दाव्यात काय होते ?
" The suit was for obtaining a declaration 
‘that the said Chawdar tank is of the nature of private property of the Touchable 
classes only and that the Untouchable classes have no right to go to
that tank nor take water therefrom and also for obtaining a perpetual 
injunction restraining the defendants from doing any of those acts.’ .."
चवदार तळे खाजगी मालमत्ता असून तिथे अस्पृश्य वर्गाला तळ्यात जाण्याचा देखील आणि पाणी भरण्याचा देखील कुठलाही हकक् नाही. प्रतिवादी डॉ. आंबेडकर आणि इतर यांना देखील निरंतर मनाई हुकूम बजावण्यात यावा. खटल्याचा निकाल लागेपर्यंत तूर्ततूर्त मनाई हुकूम देखील देण्याची विनंती वादिनी केली. १४ डिसेंबर १९२७ ला temporary injuction ची कोर्टाने ऑर्डर दिली. सदर ऑर्डर बाबासाहेबांना देण्यात आली
 
" The temporary injunction issued by the Judge was sent to Bombay and was served upon me two or three days before the Conferences actually met. There was no time to have consultation and no time to postpone the Conference either. I
decided to leave the matter to the 
Conference to decide."
पुढे मनुस्मृती दहन आणि इतर ऐतिहासिक घडामोडी घडल्या...
कोर्टातील खटल्याचे काय झाले होते ?
या पुन्हा बोलवण्यात आलेल्या महाड परिषदेसमोर सर्वात महत्वपूर्ण प्रश्न होता की, कोर्टाचा आदेश मानायचा की त्याचा सविनय कायदेभंग करायचा ? बाबासाहेब लिहितात,


"The Conference was called with the specific object of establishing 
the right to take water from the tank which was challenged by the Hindus last time. The District Magistrate had left the way open. But here was a Judge who had issued an order banning such action. 
Naturally, when the Conference met, the first question it was called on to consider was whether to disobey the order of injunction issued by the Court and enter the tank. The District Magistrate who had 
been favourable to the Untouchables now took a different view. He explained his view very clearly to the Conference which he came and addressed personally. He said that if the Civil Court had not issued 
an injunction, he would have helped the Untouchables in their attempt 
to enter the tank as against the caste Hindus, but that as the Sub-Judge had issued his order, his position had become different. He could not allow the Untouchables to go to the tank because such an act would amount indirectly to help them to break the order of His 
Majesty’s Court with impunity. He therefore felt bound to issue an 
order prohibiting the Untouchables, should they insist on going to the tank notwithstanding the injunction—not because he wanted to favour the Hindus but because he was bound to maintain the dignity of the Civil Court by seeing to it that its order was respected."



शेवटी परिषदेत निर्णय घेण्यात आला, की
"..In the end, the Conference came to 
the conclusion that it was better and safer for them to follow law and see how far it helped them to secure their rights. It was therefore decided to suspend civil disobedience of the order of the Judge till 
the final decision of the suit."
दाव्याचा निकाल लागेपर्यंत सविनय कायदेभंग स्थगित करण्यात यावा.


खटला बाबासाहेब जिंकले, पण .....
सविनय कायदे भंग स्थगित करण्याचे दुसरे अत्यंत महत्वपूर्ण कारण होते ते म्हणजे, अस्पृश्यता परंपरा (custom) म्हणून कोर्टात वैध ठरते का ? याबाबत न्यायिक निर्णय हवा होता,
(याचे आज अनेकांना आश्चर्य वाटेल, कींतू ब्रिटिश काळात अस्पृश्यता कस्टम म्हणून अनेक न्यायिक निर्णय देण्यात आले होते. आज संविधानातील विशेषतः आर्टिकल १३ आणि १७ नुसार कोणतीही कस्टम, कायदा, bye laws इत्यादी मूलभूत हककाशी विसंगत असेल तर ते शून्यवत घोषित करण्यात आले....)
बाबासाहेब सांगतात,
" One of the principal reasons which led the Untouchables to follow law and suspend civil disobedience was that they wanted to have a judicial pronouncement 
on the issue whether the custom of untouchability can be recognized 
by the Court of law as valid. The rule of law is that a custom to be valid must be immemorial, must be certain and must not be opposed to morality or public policy. 
The Untouchables’ view is that it is a custom which is opposed to morality and public policy.
 But it is no use unless it is declared to be so by a judicial tribunal. Such a decision declaring the invalidity of the custom of untouchability would be of great value to the Untouchables in their fight for civil rights because it would seem 
illegal to import untouchability in civic matters. The victory of the Untouchables in the Chawdar tank dispute was very great."




पण, न्यायिक निर्णय अस्पृश्यता कस्टम अवैध आहे, बेकायदा आहे याबाबत मौन बसला होता. बाबासाहेब दावा जिंकले होते याचे कारण स्पृश्य हिंदू सदर तळ्यावर अस्पृश्य वर्गाला पाणी घेण्याचा अधिकार अतिप्राचीन काळापासून नाही हे सिद्ध करू शकले नाही हे होते. अस्पृश्यता च मुळत चुकीची custom आहे यावर तेंव्हाच बाँबे हाय कोर्ट काहीही बोलले नाही, म्हणून
बाबासाहेब आंबेडर नाराजी व्यक्त करताना सांगतात, की
" But it was disappointing in one way that the Bombay High Court did not decide 
the issue whether the custom of untouchability was valid or not. They 
decided the case against the Hindus on the ground that they failed to prove that the custom alleged by them in respect of the tank was not immemorial. They held that the custom itself was not proved. The tank became open to the Untouchables. But the Untouchables cannot be said 
to have gained their point. The main issue was whether the custom of untouchability was a legal custom. Unfortunately the High Court avoided to give judgment on that issue. The Untouchables had to continue their struggle. "
आणि आजही संघर्ष जारी आहेच.....
महाड क्रांती दिनाच्या शुभेच्छा...💐💐

- ॲड. Pavankumar Shinde सर...✍️
8459853080
हाय कोर्ट 
छत्रपती संभाजीनगर
【 Ref: Dr. Babasaheb Ambedkar writings and speeches, volume 5 】
-------------------------------------------------------------------------------------------------


3] ​महाड सत्याग्रह: इतिहासाच्या पानातून हरवलेली क्रांती आणि 'ज्ञानाचे' राजकारण...!!!


मुंबई सेंट्रल या स्टेशनवर थोडा वेळ थांबण्यात आले. स्टेशन च्या वॉलवर गांधीजी च्या जीवनातील महत्वाच्या घटनांचे चित्र द्रष्टीस पडले. दांडी सत्यागृहात मीठ उचलताना चे गांधीजी दिसले. डॉ. आंबेडकरांचे महाड सत्याग्रहात ओंजळीने उचललेले पाणी आठवले. मिठाच मूल्य कितीही असो ते नक्कीच पाण्यापेक्षा अधिक असू शकत नाही. दांडी सत्याग्रहाच्या (१२ मार्च ते ६ एप्रिल १९३०) आधीच बासाहेबांचा पाण्याचा महाड सत्याग्रह (२० मार्च १९२७) झाला. देशातील करोडो लोग पाण्याला स्पर्श करू शकत नाहीत हि लाजिरवाणी गोष्ट आपल्या इतिहासात शिकवली जात नाही. दांडी सत्याग्रह शालेय इतिहासाच्या पुस्तकात मिळेल पण शालेय पुस्तकात महाड सत्यागृहाबाबत आपल्याला एक शब्द हि दिसणार नाही. महाड सत्याग्रह दांडी सत्याग्रहाच्या आधी होऊन सुद्धा त्याबद्दल शालेय पुस्तकात माहिती दिली जात नाही.
दांडी अनेकांना माहीत आहे, काही मोजक्याच जणांना महाड माहीत आहे…

(1) बोज्जा थारकम यांचे महाड सत्याग्रहावरील “महाड-द मार्च दॅट इस लौंचंड एव्हरी डे” पुस्तक वाचल्यावर असे समजेल कि कशाप्रकारे दांडी सत्याग्रह हा पूर्णतः नियोजित होता; सत्याग्रहाचा मार्ग, येणाऱ्या लोकांची संख्या (79 लोक) यापासून ते दुपार-रात्रीचे जेवण, राहण्याची सोय, सभेच्या आणि प्रार्थनेच्या जागा पूर्णतः नियोजित होत्या. ज्या गावात ते जाणार ते गाव आधीच स्वागतासह पूर्ण सोय करीत असे, जिथे मोर्चा जाणार तिथे आधीच एक सर्वेक्षण टीम शहानिशा करायला जायची, सर्व दांडी मोर्चेकर्ते पुरुष होते; स्त्रिया जरी यायला तयार होत्या तरी त्यांना ती नाकारण्यात आली. (1)
ज्या गावांमध्ये प्रामुख्याने पाटीदारांची वस्ती होती, वल्लभभाई पटेल ज्या जातीचे होते, त्यांना जास्त पाठिंबा मिळवण्यासाठी निवडण्यात आले. जाती आणि गुजरात प्रदेशाने दांडी मार्च ला चांगली सुरुवात करून मोर्चा काढण्यास मदत केली. वल्लभभाई पटेल यांनी मोर्च्याच्या आधी जनसमाजात चांगलाच वातावरण तयार केलं होत. (1)
आणि ध्येय काय होते तर मिठावरील कर आणि ब्रिटिश मक्तेदारी संपवणे. गांधींनी मीठ हातात घेतल्याचा फोटो तीन दिवसांनी काढला गेला कारण दांडी येथे फोटो काढायला कोणीच नसल्याने भिमरड या गावात गांधीजींना मीठ उचलण्याचे नाट्य पुन्हा करावे लागले आणि तोच फोटो दांडी सत्याग्रहाचे चित्र बनून समोर आले.(1)

महाड सत्याग्रह हा पूर्णपणे वेगळा होता; कोणताही मार्ग अथवा रस्ता पूर्वनियोजिय नव्हता, ते कसे आले, कुठून आले व कसे पोहोंचले त्यांनी काय खाल्ल (स्वतःच्या गाठोडयात जे बांधून आणले असेल ते) आणि कुठे झोपले याची नोंद नाही, सभेच्या जागी खाण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय (सत्याग्रहाच्या सभेच्या जागी ४० रुपये देऊन; पाणी मिळवले)पैसे देऊन करावी लागली. कोणीही त्यांचे स्वागत केले नाही. उलट त्यांना विरोध च झाला. वाटेत पाहुणचार करणारी गावे नव्हती. खरं तर, कोणताही मार्ग नव्हता. त्यांना मार्गाचा अधिकारही नाकारण्यात आला होता...
(1)
तरीही १०००० लोग महाडला पोहोंचले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, लोक एकटे किंवा गटात महाडकडे निघाले. स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात उत्सहाने सहभाग नोंदवला. महाड सत्याग्रह करणाऱ्यांच्या विरोधात सामाजिक वैमनस्य खूप होते आणि त्यांना या वैमनस्याच्या वातावरणातून जावे लागले. सत्याग्रह झाल्यानंतर २ तासांनी काही सवर्ण हिंदूंनी अशी अफवा पसरवली कि अस्पृश्य विरेश्वर मंदिरात घुसू पाहत आहेत. दगडाच्या देवाची सुरक्षा करायला संपूर्ण सर्वर्ण महाड काठ्या घेऊन अस्पृश्य समाजावर तुटून पडला. २० लोक गंभीर रित्या जखमी झाले. (2) महाड चे ध्येय काय होते तर मानवी मूल्यांची पुनर्बांधणी करणे. महाड हा सत्याग्रह नव्हता ते एक युद्ध होते(1); प्रथा आणि धर्माने सशस्त्र असलेल्या शक्तिशाली हिंदू समाजाविरुद्ध. एक युद्ध होते नवीन सामाजिक स्तर आणि नवीन दर्जा प्रस्थापित करण्याचे आणि हिंदुस्थानची पुनर्रचना करण्याचे.
शाळेतील मुलांना महाड सत्याग्रह का शिकवत नसतील बरे ? असे का?

भारतातील शिक्षणपद्धती एक असा मूलभूत ढाचा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे जिथे उपेक्षित वर्गाच्या शैक्षणिक शक्यतांची क्षितिजे मर्यादित करण्याचा सतत प्रयत्न प्रयत्न केला जातो. कार्टर वूडसन त्यांच्या प्रसिद्ध अशा “द मिसएडुकेशन ऑफ निग्रो” या पुस्तकात म्हणतात,”जर तुम्ही माणसाच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत असाल तर तुम्हाला त्याच्या कृतीबद्दल काळजी करण्याची गरज नाही”. उपेक्षित वर्गाच्या ऐतिहासिक घटना शैक्षणिक अभयसक्रमातून न सांगणं हि एकप्रकारची प्रतीकात्मक हिंसाच आहे. शालेय शिक्षणाच्या संदर्भात, याचा अर्थ सध्याच्या मुख्यतः उच्चवर्णीय ज्ञानाच्या आणि त्याद्वारे रचलेल्या सामाजिक आणि प्रतीकात्मक हिंसा याची उघड माहिती करून देणे हाच आहे.
ओलूफेमी तैवो त्यांच्या “एलिट कॅपचर” या पुस्तकात म्हणतात कि जेव्हा आपण संभाषण अथवा संप्रेषण(communication) करतो, तेव्हा आपण काही “सामान्य विश्वास” किंवा “परस्पर विश्वास” गृहीत धरतो—केवळ मला माहीत असलेल्या आणि तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टीच नव्हे, तर मला-ज्या गोष्टी-ज्या-तुम्हाला-माहित आहे, तुम्हाला-माहित आहे-त्या-मला- माहीत आहे, वगैरे(3). तत्वज्ञानी रॉबर्ट स्टॅल्नेकर(3) या सार्वजनिक माहितीला “सामान्य ग्राउंड” असे संबोधतात, जी एक सामायिक ढाचा तयार करते ज्याचा वापर संभाषणात सामाजिक संवाद तयार करण्यासाठी केला जातो. या सार्वजनिक माहितीबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपण तिचे काय करतो. जेव्हा आपण सामाजिक संदर्भांनुसार काही कृती करतो, तेव्हा आपण या सामान्य माहितीला (सामान्य ग्राउंड) ला सत्य असल्याप्रमाणे हाताळतो: म्हणजे, आपण ती सार्वजनिक कृतीसाठी एक आधार मानतो.(3)
लोकशाही आणि योग्य संभाषन असलेल्या समूहात ह्या सामान्य ग्राउंड मध्ये काही नवीन माहिती निर्माण होते तर काही जुनी आणि कालबाहय माहिती वजा होत असते. आता हे असे वर वर खूप छान वाटत असले तरी जमीनस्तरावर असे होत नाही. सामान्य ग्राउंड हे अशा लोकशाही पद्धतीने चालत नाही कारण आपल्या आजूबाजूला घडणारी कोणतीच संसाधने तशी काम करत नाहीत, कारण आपण गुलाम समाजात राहतो.(3)
उपेक्षित वर्गाचे काही अनुभव सत्य आणि थेट जरी असले तरी सामान्य माहितीत (सामान्य ग्राउंड मध्ये) तिचे योगदान काही प्रबळ अभिजन वर्गाकडून नाकारले जाते अथवा तिला तो दर्जा प्राप्त करू दिला जात नाही.
बोज्जा ठराकम यांचे महाड सत्याग्रहावरील “महाड-द मार्च दॅट इस लौंचंड एव्हरी डे” हे पुस्तक जार्विस गिव्हन्स(4) यांच्या भाषेत “फुजिटिव्ह पेडागॉजि (अध्यापनशास्त्र)” ” चे उत्तम उदाहरण आहे. ‘फुजिटिव्ह पेडागॉजि (अध्यापनशास्त्र)” त्याच्या प्राचीन आणि आधुनिक ऐतिहासिक अर्थामध्ये शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या प्रबळ प्रोटोकॉलपासून आणि यातुन निर्माण होणाऱ्या अनुभवांची रचना करणार्‍या वर्णनात्मक स्क्रिप्ट यापासून फारकत घेऊन एक नवीन संरचनेची निर्मिती करीत असत. (4)
भारतीय शिक्षणपद्धतीने उच्चजातीय वर्गाना साजेशी ज्ञनिर्मिती, तिचे दळणवळण आणि तिला लागणारे पोषक वातावरण तयार करण्याचे काम पूर्वीपासूनच केले आहे. त्यामुळेच ‘फुजिटिव्ह पेडागॉजि (अध्यापनशास्त्र) ज्ञानाच्या संकुचित प्रबळ संरचनेला व्यत्यय आणते आणि तडा देते. ती फक्त शालेय शिक्षणच न्हवे तर जगाच्याही शैक्षणिक द्रष्टीकोनातून मानवी मूल्य काय आहेत हे नव्याने परिभाषित करण्याचे अध्यापनशास्त्र आहे. 

(4) डू बोईस यांनी लिहले कि, “मी निग्रो शिक्षकांवर विश्वास ठेवतो, योग्य प्रशिक्षणाने ते जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत कारण त्यांनी दुःख अनुभवले तसेच सहन केले आहे आणि त्यांच्या सहानभूती खाली काहीही नाही.”(4) सिल्विया वित्नर म्हणतात कि, “ज्यांना जगाच्या वर्चस्वाच्या संरचनेचे साधन म्हणून वापर केले गेले त्यांना चांगले ठाऊक आहे कि माणूस असणे म्हणजे काय आणि माणूस असण्याच्या अटींची पुनर्रचना करणे का आवश्यक आहे, ती त्यांना “साक्षीदार लोक” म्हणून संबोधते”. (4)
हेच जगातील सर्व उपेक्षित वर्गांबद्दल बोलता येईल कि ते “साक्षीदार लोक” आहेत जे विद्रोही संकल्पनांनी जगाची पुनर्रचना करू पाहतात.
नरेन बेदीदे (5) यांनी म्हटल्याप्रमाणे ” आपली शिक्षण व्यवस्था अपयशी आहे…आपली गंभीररीत्या सदोष शिक्षणपद्धती कुठल्या पोकळीतून निर्माण झाली नाही, ती निर्माण झालीये आपल्या गंभीररीत्या आजारी अशा सदोष समाजरचनेतून.”
त्यामुळे उपेक्षित वर्गाने हे नवीन अनुभव निर्माण करणारे ज्ञान फक्त स्वतःपुरते मर्यादित न राहता शालेय शिक्षणात तसेच जनसमाजात कसे पसरेल याची दक्षता घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब म्हणाले त्याप्रमाणे “लहान लहान कार्ये हातात घेऊन ती पार पडण्याचा प्रयत्न करावा, विदयार्थ्यांनी काय शिकावं हे विदयापीठ ठरवीत असले तरी आपल्या बौद्धिक विकासाला आपण शिकतो ते खरोखरच पोषक व आवश्यक आहे कि नाही, हेही प्रतेय्क विद्यर्थ्याने पहिले पाहिजे, विद्यपीठाच्या प्रतेय्क हालचालीवर कटाक्षाने लक्ष असले पाहिजे, आपले तसेच समाजातील उपेक्षित वर्गाला आपले कायदेशीर तसेच निसर्गसिद्ध हक्क मिळवण्यासाठी “प्राणयज्ञदल संस्था” ठिकठिकाणी स्थापन केल्या पाहिजेत.” मुख्यतः हे विद्रोही लिखाण आणि विचार समाजात पसरणे गरजेचे आहे.

जार्विस गिव्हन्स दाखवतात की फुजिटिव्ह अध्यापनशास्त्राच्या अभ्यासासारखे काहीतरी टिकवून ठेवण्यासाठी, तुम्ही फक्त अराजक, एपिसोडिक, वीर पुढाकार यावर अवलंबून राहू नका,” तो म्हणतो की, “तुम्हाला या सामग्रीभोवती समुदाय तयार करावा लागेल.”
मानवी हक्कांसाठी केलेला महाड सत्याग्रह हा शिकावला जात नाही कारण तो सामान्य ग्राउंड मध्ये बदल घडवून आणायची ताकत बाळगतो. ते अशा ज्ञानाची निर्मिती करते ज्यात नवीन अनुभव निर्मितीच बीज आहे, जे उच्चवर्णीय प्रबळतेला धोकादायक ठरते. ओलूफेमी तैवो यांनी म्हटल्याप्रमाणे, “जेंव्हा आपण सामायिक ग्राउंड ला यशस्वीपणे आव्हान देतो तेंव्हा आपण सामाजिक वातावरणात बदल घडवतो.”(3)
बोज्जा थारकम यांनी म्हटल्याप्रमाणे, “महाड एक जिवंत वर्तमान आहे. जेव्हा जेव्हा मानवी हक्क पायदळी तुडवले जातात तेव्हा महाड इशारा करतो आणि जोपर्यंत मानवी प्रतिष्ठा नाकारली जाते तोपर्यंत महाडची गरज वाढते.”

-References:1] महाड-द मार्च दॅट इस लौंचंड एव्हरी डे- बोज्जा ठराकम
2] BAWS Volume 1 Part 1
3] एलिट कॅपचर- ओलूफेमी तैवो
4] फुजिटिव्ह पेडागॉजि- जार्विस गिव्हन्स
5] EWS- The quota to end all quotas
- डॉ भूषण अमोल दरकासे...✍️
लेखक VDGMC हॉस्पिटल, लातूर येथे सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत...
Thanx- Rahul Gaikwad सर....
------------------------------------------------------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!