२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन...आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान...!!!




1】 प्रजासत्ताक कुणा मुळे?
सन १९४६, भारतीय संविधान समिती तयार करण्यासाठी, सर्व प्रांतीय विधानसभा मतदार संघातून सभासद निवडले जाणार होते. डॉ. आंबेडकरांना भारताच्या नव्याने तयार
होणाऱ्या संविधान समितीत प्रतिनिधित्व करण्याची इच्छा होती परंतु "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" या त्यांच्या पक्षाचा मुंबई प्रांतातून कुणीही प्रतिनिधी नसल्याने हि शक्यता धुसर वाटत होती. नव्याने तयार होणारे स्वतंत्र भारताचे संविधान हे सर्व अल्पसंख्यांक आणि उपेक्षित समाज समूहासाठी फायद्याचे असले पाहिजे म्हणून सर्व घटकातील प्रतिनिधी त्या समितीत असावे असे त्यांना वाटत होते.
सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या सांगण्यावरून तत्कालीन बॉम्बे प्रांताचे मुख्य मंत्री खेर यांनी बाबासाहेब बॉम्बे प्रांतातून निवडून जाणार नाहीत अशी चोख तयारी केली होती. सरदार पटेल स्वतः आंबेडकरांना कसं रोखता येईल यावर लक्ष ठेऊन होते अर्थात कॉंग्रेस सुप्रीमो कडून आलेल्या या सूचना असतील. डॉ. आंबेडकरांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना त्यांनी कोंग्रेसी दलित चेहऱ्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली, त्यापैकी एक जगजीवन राम हे होते. कॉंग्रेस ने ज्यांना संविधान आणि कायद्यांचा अभ्यास आहे अशा लोकांना निवडले नाही तर
ज्या लोकांना स्वातंत्र्य लढ्यात कारावास झाला त्या लोकांना समितीसाठी निवडले गेले.
कॉंग्रेस आपल्याला स्वतःहून या समितीत घेणार नाही हे आंबेडकरांना माहीत होते कारण कॉंग्रेस वर जहाल टीका करणाऱ्यांपैकी आंबेडकर हे एक होते. या समितीत कसे जायचे हा विचार सुरु असतानाच डॉ आंबेडकरांच्या पक्षातील जोगेंद्र नाथ मंडल हे बंगाल प्रांतातील सभासद होते, उत्तर बंगाल मध्ये त्यांची बंगाली दलित आणि मुस्लिम यांचा त्यांना पाठींबा होता. त्यांनी बाबासाहेबाना बंगाल मधून निवडून आण्याची जबाबदारी घेतली आणि डॉ आंबेडकर बंगाल मधून निवडणूक लढून निवडून आले.
बाबासाहेब आता बंगाल चे प्रतिनिधी म्हणून संविधान समितीच्या २९६ सभासदांपैकी एक म्हणून ९ डिसेंबर १९४६ च्या पहिल्या संविधान समितीच्या बैठकीत उपस्थित
राहिले. सर्व कॉंग्रेस आणि इतर पदाधिकारीच नाहीत तर ब्रिटीश अधिकारी सुद्धा डॉ आंबेडकरांना संसदेत पाहून आश्चर्यचकित झाले.
डॉ. आंबेडकरांनी पुढील एक वर्ष संविधान निर्मितीतील बैठकींमध्ये आपले अभ्यासपूर्ण मत मांडले,चर्चेत भाग घेतला, या काळात कॉंग्रेस मधील त्यांच्या बऱ्याच विरोधकांना आंबेडकरांना जवळून ओळखण्याची संधी मिळाली त्यांची विद्वत्ता, अभ्यास, मुद्देसूद भाषणे ऐकून ते त्यांचे प्रशंसक झाले, मित्र झाले आणि डॉ. आंबेडकर घटना तयार करण्यात खूप महत्वाचे आहेत हे सर्वांना कळून आले. परंतु ज्या बंगाल च्या प्रांतातून बाबासाहेब संविधान समितीवर गेले होते तो प्रांत बंगालच्या फाळणीत वेगळा केला गेला (कि तशी तजवीज केली नेहरू आणि गांधी यांनी?) त्यामुळे डॉ. आंबेडकरांना जुन १९४७ मध्ये पुन्हा सदर संविधान समितीच्या निवडलेल्या सभासदांमधून बाहेर पडावे लागले.
डॉ. आंबेडकरांच्या जाण्याने खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि आपण एका महान, अभ्यासू, हुशार व्यक्तीला गमावून बसू असं खुद्द कॉंग्रेस मधील लोकांना वाटू लागलं. ज्या सरदार वल्लभ भाई पटेल यांनी बाबासाहेबांना १९४६ मध्ये निवडून येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले त्याच सरदार
पटेलांना बॉम्बे प्रांतातून निवडून आलेल्या जयकर यांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागी आंबेडकरांना (राज्य सभेवर) घेऊन पुन्हा संविधान समितीच्या कार्यकारिणीत घ्यावे लागले पुढे डॉ. आंबेडकरांना जरी मसुदा समितीचे अध्यक्ष केले तरी त्यावर एक स्वतंत्र घटना समिती बनवली गेली त्याचे अध्यक्ष स्वतः राजेंद्र प्रसाद हे होते जे तयार केलेल्या मसुद्यावर (कॉंग्रेस नेत्यांच्या सहमताने) अंतिम
निर्णय घेत होते.
असं असलं तरी स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि समानता तसेच समाजातील सर्व घटकांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणारी ३९५ अनुच्छेद आणि ८ अनुसूची (आता १२) असलेली सर्वात मोठी लोकशाही देणारी घटना डॉ. आंबेडकरांच्या अथक परिश्रम, सखोल अभ्यास आणि दूरदृष्टीतून साकार झाली.
२४ जानेवारी १९५० साली स्वतंत्र भारताची राज्यघटना स्वीकारली गेली आणि २६ जानेवारी १९५० रोजी ती अमलात आणली गेली. तसेच हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून घोषित करण्यात आला.


【Ref - debate in constitutional assembly 1946】
भारतीय संविधान चिरायू होवो !!
-अमोल गायकवाड...✍️
-----------------------------------------------------------


2] २६ जानेवारी १९५० : प्रजासत्ताक लोकशाही क्रांतीचा दिवस...


२६ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत एक लोकशाही गणराज्य म्हणून अस्तित्वात आला. त्यामुळे हा दिवस आपण गणराज्य दिन म्हणून साजरा करतो, हे सर्वांनाच ज्ञात आहे.

मात्र या दिवशी अनेक सरकारी कार्यालये, खासगी संस्था व सोसायट्यांमध्ये सत्यनारायणाची पूजा, राजपथावर सांस्कृतिक प्रतीकांचे संचलन आणि लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते. बहुसंख्य आंबेडकरवादी अभ्यासक व कार्यकर्ते याचा संबंध हिंदू धर्मातील अंधश्रद्धा व धार्मिक समजुतींशी जोडतात. परंतु या साऱ्या गोष्टींचा एक गंभीर राजकीय अर्थ आहे, याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

खरे तर २६ जानेवारी १९५० रोजी भारतात घडून आलेल्या महान क्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती मजबूत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. दुर्दैवाने, भारतात नव्या क्रांतीची आस लावून बसलेले माओवादी, मार्क्सवादी डावेच नव्हे, तर अनेक आंबेडकरवादीसुद्धा हे विसरतात की—
👉 भारतामध्ये २६ जानेवारी १९५० रोजी एक ऐतिहासिक क्रांती घडून आलेली आहे...
ही क्रांती म्हणजे
🔥 प्रजासत्ताक लोकशाही क्रांती (Republican Democratic Revolution) 🔥
या क्रांतीने इंडिया, हिंद किंवा हिंदुस्थान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशाला “भारत” ही नवी ओळख दिली. हजारो वर्षांपासून या देशात रुजलेली धर्मसत्ता या क्रांतीने नष्ट केली.

या क्रांतीने पुढील मूल्यांचा निर्धार केला—
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य
दर्जाची व संधीची सर्वंकष समानता
व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता
बंधुतेचा विकास

हा निर्धार लोकशाही गणराज्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प करण्यात आला.
ही क्रांती रक्तहीन मार्गाने भारतीय संविधानाद्वारे घडून आली. या क्रांतीची जन्मदात्री होती भारतीय संविधान सभा आणि या संपूर्ण क्रांतीकार्याचे तत्त्वज्ञानात्मक व व्यावहारिक नेतृत्व संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून
👉 डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव आंबेडकर यांनी केले.
म्हणूनच भारतात घडून आलेल्या या प्रजासत्ताक लोकशाही क्रांतीचे खरे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.

त्यामुळे दरवर्षी २६ जानेवारीला—
आपले लष्करी सामर्थ्य किती आहे,
भौतिक प्रगती किती झाली,
किती मंदिरे, पर्यटनस्थळे, पोशाख, नृत्य-संगीत परंपरा आहेत,

याचे प्रदर्शन करण्यापेक्षा राज्यकर्त्यांनी व नागरिकांनी आत्मपरीक्षण करणे अधिक आवश्यक आहे.
आज देशात—
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय कितपत प्रस्थापित झाला आहे?
विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना मुक्तपणे उपभोगता येते का?
दर्जाची व संधीची समानता सर्व नागरिकांना मिळते आहे का?
व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता जोपासणारी बंधुता वाढते आहे का?


👉 या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधण्याचा दिवस म्हणजे २६ जानेवारी.
लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेल्या या राष्ट्राची उद्दिष्टे कितपत साध्य झाली, याचा आढावा घेण्याचा हा दिवस आहे. पण आज दुर्दैवाने या दिवसाला धार्मिक व सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या उन्मादी उत्सवाचे स्वरूप दिले जात आहे.
असे करणे म्हणजे— ⚠️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेल्या प्रजासत्ताक लोकशाही क्रांतीला
धर्मनियंत्रित अभिजनसत्ताक प्रतिक्रांतीमध्ये रूपांतरित करण्याचे कारस्थान आहे.
हे ओळखून, या प्रतिक्रांतीला अटकाव करून ती नेस्तनाबूत करण्याचा निर्धार पुन्हा एकदा करण्याची गरज आहे.

- सुनील खोब्रागडे सर ✍️
-----------‐-----------------------------------------------------------------


3】 देशाला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ ला मिळाल परंतु खर्या अर्थाने देश आणि त्याच भविष्य त्याच बेसिक structure काय असायला पाहिजे ,देश भविष्यात कशी प्रगती करेल ,इथली राज्यव्यवस्था कशी असली पाहिजे परकीय लोक कधीच या देशावर आपली सत्ता मिळवू नाही शकणार यासाठी एक मजबूत आणि सुरक्षित देश कसा राहील यासाठी जे महत्वाच structure असाव लागत ते म्हणजे देशाचे संविधान .

आज जो देश मागील हजारो वर्षाच्या तुलनेत प्रगतीपथावर उभा आहे त्याच श्रेय निश्चित राष्ट्रपुरुषांना जाते कुठल्याही काल्पोकाल्पित देव देवांना नाही . भारताच्या उभारणी मध्ये राज्यघटना निर्माण करण्याचे आणि देश उभा कसा राहील याचा सखोल अभ्यास असणारे जगातील अव्वल विद्वान म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि जगातील मानवमुक्ती अग्रणीय विश्वपुरुष डॉ .बाबासाहेब आंबेडकर . प्रजासत्ताक दिन म्हणजे खरोखर या देशाला राजकीय स्वातंत्र्य राज्यघटनेनुसार प्राप्त होऊन ज्या धर्म ग्रंथांनी देव धर्मांचा डोंब माजवून मनुष्यालाच हीन समजून सर्व अधिकारापासून दूर ठेवलं आणि पशूपेक्षाही वाईट वागणूक दिली त्या धर्मग्रंथानां चोख उत्तर म्हणजे समता ,बंधुता आणि स्वातंत्र्य या तत्वावर भारतीय संविधान देऊन धर्मगुरू गुन्हा करेल त्याला तीच शिक्षा आणि सामान्य माणूस करेल त्यालाही समान शिक्षा या मौलिक विचारावर संविधानाची उभारणी करून बाबासाहेबांनी या देशाची उभारणी केली . पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉ .बाबासाहेबांची विद्वत्ता ओळखून वेळोवेळी बाबासाहेबांच्या कार्यशैलीला नेहमीच आदर दिला काही गोष्टी मतभेदाच्या असू शकतात परंतु राष्ट्रउभारणी मध्ये बाबासाहेबांसह अन्य महापुरुषांचा सहभाग होता त्यात पंडित नेहरू चे नाव घ्यावेच लागेल .

कामगार शोषित पीडितांचे प्रश्न असो कि ,उद्योग धोरण ,विदेश नीती ,जलसंधारण या बाबतीत बाबासाहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे अनेक धारण प्रकल्प डॉ .बाबासाहेबांच्य
ा देखरेखीत तयार करण्यात आली होती ,नद्या जोडणी प्रकल्प हा त्या काळात बाबासाहेबांनी मांडून त्याची दिशा त्यावेळी ठरवून दिली होती त्याची पुढे अंमलबजावणी अटल बिहारी वाजपेयी सरकारने करण्याच्या प्रयत्न सुरेश प्रभुनी केला परंतु अद्याप अनेक बाबी बाकी आहेत . राज्यघटना राबविणे हे राज्यकर्त्याचे काम आहे ,राज्यकर्ता योग्य नसेल तर घटनेला दोष देऊन काहीही उपयोग नाही कारण त्याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रत्येक नागरिकाचे आहे .
सार्वभौम जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून प्रसिद्ध असलेल्या देशात प्रजासत्ताक दिनाचे महत्व कमी पण नरेंद्र मोदी मेहमान नवाजी ,फोटो काढणे देशातील जनतेला लहान मुलासारखे फोटो दाखवणे ,जिगरी दोस्ती असण्याचा आव आणणे आणि प्रसारमाध्यमांचा त्यापेक्षाही बालीशपणाचा कहर झालेला दिसला . सप्टेंबर २०१४ ला अमेरिकेमध्ये अनेक राष्ट्रांनी आपल्या देशाच्या विकासासाठी १० ते २० करार तिथल्या उद्योगांशी केले होते परंतु फोटो फोबियाग्रस्त नरेंद्र मोदी फोटोशिवाय कुठलीही ठोस गोष्ट करू शकले नाहीत . आज बराक ओबामा अमेरिकन policy शिवाय येणे शक्य नाही ते पहिल्या भेटीत अणुकरारद्वारे दाखवून दिलंय . पारंपारिक उर्जा स्रोत यावर अवलंबून न राहता automic energy अणु उर्जा निर्माण करून उर्जेची गरज भागवणे हे जरी मुख्य लक्ष असले तरी . atomic deal , foreign इन्वेस्टमेंट सारख्या गोष्टी देशाच्या सुरक्षेला सार्वभौमत्वाला छेद देणार नाही नां याचा धोका निर्माण होत आहे .काही वर्षापूर्वी २२ % FDI ला विरोध करणारी भाजपा आज ४९ % विदेशी गुंतवणूक आणि तेही विमान ,सुरक्षा ,रेल्वे क्षेत्रात नक्कीच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे .अमेरिकत तंत्रप्रणाली हि भारताच्या 100 वर्षे पुढे आहे .इस्ट इंडिया कंपनी या ब्रिटीश कंपनी ने केलेली सुरुवात पुढे देश गुलाम होण्याला कारणीभूत झाली . १९२१ -२२ च्या दरम्यान डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी लंडन स्कूल ऑफ एकोनोमिक ला असताना प्रोब्लेम ऑफ रुपी शोध निबंध लिहून विद्यापीठात समाविष्ट होऊन तो त्या काळात प्रचंड गाजला . इंग्रजांच्या धोरणांचे त्यांच्यात भूमीत जाऊन वाभाडे काढणारे सच्चे देशभक्त बाबासाहेब आंबेडकर होते . परंतु आज देशाचा विचार न करता भविष्यात देशाला गुलामगिरी मध्ये टाकण्याची मानसिकता राज्यकर्त्यांनी ठरविली आहे अस म्हणायला हरकत नाही .

. IT तंत्रज्ञानात भारतच डोक आहे परंतु अमेरिकन विकासासाठी ते वापरल जात त्याचा उपयोग आपल्याच देशासाठी करण्यात अजूनही आपण अपयशी आहोत . चीन ,जपान ला स्वतः च IT technology आहे ,स्वतःच्या operating systems आहेत परंतु आजही आपण आपल्या systems तयार केलेल्या नाहीत .
एकंदरीत देशाच्या जडणघडणीचा प्रश्न ,समाजातील गरीब ,शोषित समाजाचा स्तर ,महिला सुरक्षा , देव ,धर्म काल्पनिक गोष्टींचा उहापोह करून देशाला मागे टाकण्यात काही शक्ती सदैव सरसावत असतात आणि निमुटभर लोकांच्या हाती सत्ता कशी राहील आणि निवडक लोकांना त्याचा फायदा कसा होईल याचा विचार काही प्रवृत्ती करत असतात .देशाचा एक नागरिक म्हणून आपण देशाचा प्रथम विचार करून देश प्रगतीपथावर जाण्यासाठी अशा दृष्ट प्रवृत्तींचा नयनाट केल्याशिवाय हा देश घडणार नाही एव्हढे मात्र निश्चित .


आर्टिकल by-प्रविण जाधव...✍️
-------------------------------------------------------------------------


4]  टेक्निकली १५ ऑगस्ट नाही तर २६ जानेवारी हाच आपला स्वांतत्र्य दिन आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली तरी ती अधिकृत घोषणा म्हणता येणार नाही. कारण व्हाईसरॉय असलेला आधीचा माऊंटबॅटन नंतर जनरल बनुन तेव्हा उरावर बसलेला होता आणि संविधान सभेचं कार्य प्रवाह प्रक्रियेत होतं. १५ ऑगस्ट म्हणजे गोंधळाचा असंदिग्ध दिवस. कोण स्वांतत्र्य झालं कोणाला स्वांतत्र्याच्या मोबदल्यात काय मिळालं ? नागरीक म्हणून घेण्यासाठी संविधानिक ओळख काय? हे काहीच स्पष्ट नव्हतं. आपलं स्वांतत्र्य व अस्तित्व संविधानाने अधोरेखित केलं, त्याला सुरक्षित केलं. आपलं शासन आपण निवडायला घेतलं. जेव्हा संविधान स्वीकारलं तेव्हा ना व्हाईसरॉय ना कोणी जनरल भारताला होता. ब्रिटिशांचा परकीयांचा राजकीय हस्तक्षेप संपला होता. आपलं संविधान आपल्या लोकांनी आपल्या साठी स्वीकारलं. २६ नोव्हेंबर हाच भारताच्या राजकीय स्वांतत्र्याचा अनुभव देणारा दिवस आहे. भारतीय संविधान स्वातंत्र्याचं घोषणापत्र आहे जे २६ जानेवारीला अंमलात आलं. 

आम्ही ब्रिटिश मुक्त झालो पण शोषण मुक्त नाही. राजकीय समता मिळाली असलं तरी सामाजिक समता व सामाजिक लोकशाही नाही... खुप काही मिळालं असलं तरी खुप काही अजुन बाकी आहे.
सामाजिक समता व सामाजिक लोकशाही प्रस्थापित होत नाही तोपर्यंत संपुर्ण स्वांतत्र्य सिद्ध नाही. 
संविधानाच्या रुपात स्वांतत्र्याचा जाहीरनामा लिहला त्या बाबासाहेबांना मनःपुर्वक अभिवादन... आणि सर्व भारतीयांना लोकतंत्र दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा ❤️

- Rahul Pagare...✍️💗

--------------------------------------------------------------------------


5】 २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत,राजकारणात आपल्याकडे समता राहील; परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्याकडे विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उध्वस्त करतील......


-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर....✍📚
【Ref: २५ नोव्हेंबर, १९४९ ला संविधान सभेत डॉ. आंबेडकर द्वारा दिल्या गेलेल्या भाषणातून उदध्रुत.】
---------------------------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!